मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची भेट घेणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची भेट घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी
| Updated on: May 11, 2021 | 6:02 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती महोदयांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (CM Uddhav Thackeray meets governor Bhagat Singh Koshyari for Maratha reservation)

‘राष्ट्रपतींना पत्र, पंतप्रधानांची भेट घेणार’

गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांनाही एक पत्र देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने पहिली पायरी म्हणून राज्यपालांची भेट घेतली. आम्ही बोललो होतो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करु, ती आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून केली आहे. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला. त्यांना माहिती आहे, ही लढाई सरकारविरोधात नाही, सरकारही सोबत आहे. या समाजाच्या मागणीविरोधात कोणताही पक्ष नाही. जो काही समजूतदारपणा दाखवला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

‘..तर राज्यपालांना भेटायला यावं लागलं नसतं’

फडणवीसांचा कायदा फुलप्रूप असता, तर आज राज्यपालांना भेटायला यावं लागलं नसतं. आज आम्ही पत्र दिलं आहे, त्याचं उत्तर काय येतं ते पाहू. त्याची प्रतीक्षा जनतेला आहे. राज्यपालही सहमत आहेत. त्यांनी पत्र वेळेत पोहोचवण्याचं आश्वासन दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, राष्ट्रपती, पंतप्रधानांना हातजोडून विनंती; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Maratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र

CM Uddhav Thackeray meets governor Bhagat Singh Koshyari for Maratha reservation