
राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील २,८६९ जागांपैकी १,४२५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या विजयामुळे भाजपने ठाकरे आणि पवार कुटुंबांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना मोठे खिंडार पाडले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) भाजपने ८९ जागा जिंकल्या. त्यामुळे ठाकरे कुटुंबाचे तीन दशकांचे वर्चस्व संपुष्टात आले. सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष शिवसेनेने २९ जागा जिंकल्या. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ६५ जागांपर्यंत मजल मारली. त्यासोबतच काँग्रेसला २४ आणि मनसेला ६ जागा मिळाल्या.
पुण्यात भाजपने ११९ जागा जिंकून पवार कुटुंबाला मोठा धक्का दिला. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २७, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ ३ जागा मिळाल्या. नागपूरमध्ये १५१ पैकी १०२ जागा जिंकत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. नाशिक (७२), नवी मुंबई (६५), पिंपरी-चिंचवड (८४) आणि सोलापूर (८७) या शहरांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
| महानगरपालिका | विजयी पक्ष / आघाडी | प्रमुख विरोधी पक्ष | सत्तेची स्थिती |
| मुंबई | महायुती (भाजप + शिंदे) | शिवसेना (UBT) | महायुतीची सत्ता |
| पुणे | भाजप | राष्ट्रवादी (अजित/शरद पवार) | भाजपची सत्ता |
| नागपूर | भाजप | काँग्रेस | भाजपची सत्ता |
| ठाणे | शिवसेना (शिंदे गट) | शिवसेना (UBT) / राष्ट्रवादी | महायुतीची सत्ता |
| नाशिक | भाजप | शिवसेना (UBT) / मविआ | भाजपची सत्ता |
| पिंपरी-चिंचवड | भाजप | राष्ट्रवादी (अजित पवार) | भाजपची सत्ता |
| छ. संभाजीनगर | भाजप | AIMIM / शिवसेना (UBT) | भाजप सर्वात मोठा पक्ष |
| नवी मुंबई | भाजप (गणेश नाईक गट) | शिवसेना (UBT) | भाजपची सत्ता |
| कोल्हापूर | काँग्रेस / महाविकास आघाडी | भाजप | मविआचे वर्चस्व |
| लातूर | काँग्रेस | भाजप | काँग्रेसची सत्ता |
| चंद्रपूर | काँग्रेस | भाजप | काँग्रेसची सत्ता |
| वसई-विरार | बहुजन विकास आघाडी | महायुती | बविआची सत्ता |
| मालेगाव | इस्लाम आघाडी / AIMIM | महायुती | स्थानिक आघाडी |
| अकोला | भाजप | काँग्रेस / VBA | भाजपची सत्ता |
| अमरावती | भाजप / स्थानिक आघाडी | काँग्रेस | भाजप आघाडीवर |
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या एकूण निकालात शिवसेनेला ३९९, काँग्रेसला ३२४, तर राष्ट्रवादीला (अजित पवार) १६७ जागा जिंकता आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने ५७ जागांसह यश मिळवले. तर तिथे एआयएमआयएमने ३३ जागा जिंकल्या. तसेच लातूर, भिवंडी आणि चंद्रपूरमध्ये मात्र काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवून ठेवत चांगली कामगिरी केली आहे. मात्र या निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात भाजपची पकड अधिक घट्ट झाली आहे. यामुळे प्रस्थापित प्रादेशिक पक्षांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.