आता आणखी एक समाज रस्त्यावर उतरणार? मंत्री संजय राठोड यांचा इशारा; काय आहे मागणी?
महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न पेटला असून, मराठा आणि ओबीसी समाजासोबतच आता भटक्या विमुक्त समाजाचाही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच, विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्या तीव्र होत असल्याने राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उभे ठाकले आहेत. जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते उद्या 1 सप्टेंबर रोजी आरक्षण प्रश्नावर मुंबईत धडक देणार आहेत. राज्यातील आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता आणखी एक समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी भटक्या विमुक्तांच्या आरक्षण प्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. थेट सरकारमधील मंत्र्यानेच इशारा दिल्याने आरक्षण प्रश्न अधिकच पेटणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला आहे. जसं मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय, ओबीसी लढतोय, आम्ही तर आंदोलनाची भाषा करत नाही. पण या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न करावे ही आमची मागणी आहे. आरक्षण मिळावं यासाठी आम्ही रस्त्यावरची ही लढाई लढू, असा इशारा संजय राठोड यांनी दिला आहे.
सरकारने प्रयत्न करावे
ज्या समाजाला कायम गुन्हेगार म्हणून पाहिलं जायचं, त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत. आज त्यांची परिषद आहे. गावा खेड्यात स्वातंत्र्यानंतरही या भटक्या विमुक्त समाजाचे हाल होत आहेत. या समाजाला सुविधा नाहीत. शिक्षण नाही. समाज विखुरलेला आहे. जसं मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय, ओबीसी लढतोय, आम्ही तर आंदोलनाची भाषा करत नाही. पण या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न करावे ही आमची मागणी आहे. त्यामुळेच आम्हीही आमच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याच्या तयारीत आहोत, असं राठोड यांनी स्पष्ट केलं.
जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. अंतरवली सराटीत जरांगे यांचं शेवटचं आणि निर्णायक आंदोलन सुरू आहे. गेल्या तीन दिवसापासून जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज संध्याकाळपर्यंत जरांगे यांच्या मागण्यावर तोडगा काढू असं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र, सरकारचा प्रस्ताव जरांगे यांना मान्य होणार की नाही हे संध्याकाळीच कळणार आहे.
जरांगे पाटील यांनी अंतरवलीत आंदोलन सुरू केलं असलं तरी त्यांनी मुंबईत येण्याचा निर्धार केला आहे. मुंबईत लाखो लोकांना घेऊन येणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जरांगे हे सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुंबईला येण्याचा फायनल प्लान तयार केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.