मनोज जरांगेंशी फोनवर काय झाली चर्चा? उदय सामंत यांनी सांगितली ती गोष्ट

मनोज जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपांवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जरांगेंशी फोनवर झालेल्या चर्चेचा तपशील देत, सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

मनोज जरांगेंशी फोनवर काय झाली चर्चा? उदय सामंत यांनी सांगितली ती गोष्ट
uday samant
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2026 | 2:54 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात ठाकले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठ्यांचे कुणबी प्रमाण रद्द करण्यात येत आहे. राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्याने हे होत आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठ्यांचा विश्वासघात केला आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सरकारमध्ये आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या या आरोपानंतर राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी जरांगेंशी फोनवरून चर्चा केली होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे सामंत यांनी आज स्पष्ट केले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्याबाबत झालेल्या चर्चेचा तपशील दिला. एकनाथ शिंदें विरोधात गैरसमज पसरवला जात आहे. एखाद्या आंदोलनाविरोधात शिंदे जाऊच शकत नाही. सरकारची ती भूमिका नाही, असं मी जरांगेंना सांगितलं. माझी सर्वच नेते मंडळींना विनंती आहे की, महाराष्ट्र एकसंघ आहे. जातीपातीच्या राजकारणात उभ्या भिंती निर्माण होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आम्ही सरकारमधूनही घेणार आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं. जरांगे यांना फोनवर हीच माहिती दिल्याचंही ते म्हणाले.

बावनकुळेंशी चर्चा

माझी चंद्रशेखर बावनकुळेंशीही चर्चा झाली. गैरसमजातून हे घडत असल्याचं बावकुळेंनी सांगितलं. सरकारने मराठा समाजाबाबत घेतलेला निर्णय बदलणार नाही. आणि ओबीसींवर अन्याय करणार नाही. असं बावनकुळे यांनी सांगितलं, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.

हाकेंशी चर्चा करायला तयार

यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं स्पष्ट केलं. लक्ष्मण हाकेंशी चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकारचा इगो नाही. ओबीसींवर अन्याय होणार नाही. ओबीसींचं काहीही कमी होणार नाही ही सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आणि त्यांच्या प्रमाणपत्राबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय महायुतीनेच घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

जरांगेंचे आरोप काय?

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण हे प्रमाणपत्र मिळत नाहीत. रद्द केली जात आहेत. बावनकुळे यांच्या आदेशाने हे होत आहे, असं जरांगे यांचं म्हणणं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मराठा आरक्षण विरोधकांच्या बैठका होत आहेत. शिंदे आमच्याशी डबल गेम खेळत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us