पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील कर्मचारी, पोलीस ठाण्यात दीड हजार जणांची ड्युटी

परप्रांतियांना परत पाठवण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे (Mantralaya Employees to help Mumbai Police)

पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील कर्मचारी, पोलीस ठाण्यात दीड हजार जणांची ड्युटी
| Updated on: May 20, 2020 | 12:35 PM

मुंबई : राज्यातील पोलीस दलाभोवती ‘कोरोना’चा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे तणाव वाढत चाललेल्या पोलिसांच्या मदतीला आता मंत्रालयातील कर्मचारीही येणार आहेत. परप्रांतियांना परत पाठवण्याच्या कामात पोलिसांना कर्मचाऱ्यांची मदत होणार आहे. (Mantralaya Employees to help Mumbai Police)

पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची आता पोलीस ठाण्यात ड्युटी लागणार आहे. जवळपास दीड हजार कर्मचारीवर्ग पोलिसांच्या मदतीला येणार आहे.

परप्रांतियांना परत पाठवण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.

मंत्रालयातील कर्मचारी स्थलांतरित मजुरांची माहिती संकलित करणार आहेत. यासाठी हे कर्मचारी पोलिसांना मदत करणार आहेत. 1421 मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी हे पोलीस दलाला उपलब्ध होणार आहेत.

राज्यात एका दिवसात 60 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. एकूण 1388 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना आतापर्यंत ‘कोरोना’ची लागण झाली आहे. एकूण 12 पोलिसांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर 428 पोलीस बरे होऊन घरी परतले.