मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मराठा समाजाने EWS मध्ये लाभ घ्यावा: नवाब मलिक

| Updated on: Jun 01, 2021 | 2:15 PM

ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. | Maratha Reservation

मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मराठा समाजाने EWS मध्ये लाभ घ्यावा:  नवाब मलिक
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने सध्या मराठा समाजाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्केच आरक्षण देण्यात आलेले आहे. ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांना EWS चा लाभ घेता येईल. तात्पुरत्या काळासाठी मराठा समाजाने या सवलतीचा फायदा घ्यावा, असे नवाब मलिक यांनी म्हटले. (NCP leader Nawab Malik on Maratha Reservation)

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या समाजाला EWS मध्ये लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. आजच्या घडीला मराठा समाजाला जे विशेष आरक्षण देण्यात आले होते ते न्यायालयाने रद्द केले आहे आणि आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आता जो गरीब मराठा वर्ग आहे त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारने हा आदेश निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितलं.

भेटींचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरून तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. ही भेट राजकीय असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक दुश्मनासारखे कधीच काम करत नाहीत. महाराष्ट्राची ती परंपरा नाही. अशा भेटी होत असतात. त्याचा चुकीचा अर्थ काढू नका, असं आवाहन करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली होती. शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

मराठा समाजाच्या भूमिकेकडं लक्ष

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाच्या संघटनांचे नेते आक्रमक झाले होते. काही संघटनांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. त्यामागणीनुसार राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मंडळी सरकारच्या या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय

Maratha Reservation: फडणवीस संभाजीराजेंना म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मी कोणासोबतही बसायला तयार, पण…..

मोदींवर नाराजीचा प्रश्नच नाही, पण…; खासदार संभाजी छत्रपती काय म्हणाले? वाचा!

(NCP leader Nawab Malik on Maratha Reservation)