जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? 2 लाखाचा फोन, ठेकेदार कुठून आले? बारस्कारांच्या आरोपाने राज्यात खळबळ
अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंना डिफेंडर कार कोणी दिली? त्यांच्या मुलाकडे २ लाखाचा मोबाईल कुठून आला? उपोषण सोडताना कंत्राटदार कसे उपस्थित होते? कंत्राटदारांना ७५० कोटींची कामे कशी मिळाली? अशा प्रश्नांची सरबत्ती करत बारस्कर यांनी जरांगेंना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मनोज जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? जरांगेंच्या मुलाकडे दोन लाखाचा मोबाईल कुठून आला? जरांगे उपोषण सोडत असताना तिथे ठेकेदार कसे आले? या ठेकेदारांचा विखे पाटलांशी संबंध काय? अशा प्रश्नांची सरबत्तीच अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अजय महाराज बारस्कर हे आरोप करत असताना मनोज जरांगे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे अधिकच गूढ वाढलं आहे.
अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांची पोलखोल केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना डिफेंडर कार देण्यात आली. ही कार देणारा सांगलीचा भोसले कोण आहे? मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाची लायकी नसताना त्याच्याकडे 2 लाखांचा मोबाईल फोन कुठून आला? जरांगेंच्या मुलाला पैसे कोण देतं? असे सवाल करतानाच जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासोबत खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी. मी चर्चेला करायला तयार आहे. तुमच्यात हिंमत आहे ना? मग याच चर्चा करायला. तुमची बुद्धी किती आहे हे दिसून येईल, असं आव्हानच अजय महाराज बारस्कर यांनी दिलं आहे.
त्यांनाच कंत्राटं कसे मिळतात?
जरांगे पाटील यांच्या संदर्भात एक खळबळजनक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे ट्विट वैभव कोकाटे यांनी केलं आहे. जरांगेंनी उपोषण सोडलं त्याठिकाणी किशोर बलांडे हा ठेकेदार काय करत होता? या बलांडेच्या माणिक इन्फ्रा कंपनीला मागच्या काही वर्षात 750 कोटी रुपयांचं कंत्राट कसं काय मिळालं? जे आंदोलनात मध्यस्थी करतात त्यांच्या कंपन्यांनाच कंत्राट कसे मिळतात? याची उत्तरे जरांगे पाटील यांनी द्यावीत, असं आव्हानही बारस्कर यांनी केलं आहे.
कंत्राटदारच का लागतात?
किशोर बलांडे यांना ईडीची नोटीस आली असेल. त्यामुळे ही नोटीस थांबवण्यासाठी तुम्ही आता आंदोलन मागे घेतल का? अनेक मराठा आंदोलकांनी आपला जीव मराठा आरक्षणासाठी गमावला. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडत असताना या तरुणांच्या घरातील एकही व्यक्ती का नव्हती? उपोषण सोडतेवेळी जरांगेंना कंत्राटदारच का लागतात? याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असंही ते म्हणाले.
विखे साहेब, तुम्ही काय करत आहात?
राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही तुमच्या खात्यातून बलांडेंना कोट्यवधीची कामे दिली. याच उत्तर द्या. विखे पाटील तुम्ही काय करत आहात? आंदोलन सुरू असताना जरांगेंनी तुमच्यावर खालच्या भाषेत टीका केली. उपोषण सोडताना मात्र तुमच्यावर प्रेम करण्याचा संदेश दिला. याच आंदोलनात जरांगेंनी विखे पाटलांना शिव्या दिल्या. आणि आता प्रेमाचा संदेश देत आहेत. त्याचं उत्तर विखेंनी द्यावं. विखे नगर जिल्ह्याचे आहेत. विखे साहेब, तुमचा वारसा कुठे? आणि तुम्ही काय करत आहात? असा सवालही त्यांनी केला. विखेंना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर खुशाल मुख्यमंत्री व्हा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.