25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह राजेश टोपे यांच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या, वाचा सविस्तर

| Updated on: Apr 06, 2021 | 10:03 PM

राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे 25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह राजेश टोपे यांच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या, वाचा सविस्तर
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची मागणी
Follow us on

मुंबई : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनाला रोखण्यासाठी राबवली जाणारी लसीकरण मोहीम, याचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. या संवादात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे 25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. (Meeting between Dr. Harshvardhan and Dr. Rajesh Tope)

“केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे.त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश देणेबाबत विनंती केली. यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते”, अशी माहिती टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचंही पंतप्रधान मोदींना पत्र

२५ वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

तरुण वर्गाला लस गरजेची

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलंय. कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र सरकार ठोस पावलं उचलत आहे. याविषयी मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली आहे. चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरवली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : ‘लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करा, अन्यथा उद्रेक होईल’, उदयनराजेंचा इशारा

कोरोनाचा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी घातक, पिंपरीत जुळ्यांना जन्म दिलेल्या मातेला कोरोनाने हिरावलं!

Meeting between Dr. Harshvardhan and Dr. Rajesh Tope