Vidhan Parishad Election Result 2022: अखेर नाथाभाऊंनी बाजी मारली, रामराजेही जिंकले, अजित पवारांच्या सारथ्यानं राष्ट्रवादीची नय्या पार

| Updated on: Jun 20, 2022 | 10:14 PM

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीनं खडसेंचं नाव टाकलं पण अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. खडसेंची प्रतिक्षा कायम राहिली. शेवटी त्यांचा राजकीय उपयोग पाहून राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवलं आणि त्यात ते यशस्वी झाले.

Vidhan Parishad Election Result 2022: अखेर नाथाभाऊंनी बाजी मारली, रामराजेही जिंकले, अजित पवारांच्या सारथ्यानं राष्ट्रवादीची नय्या पार
अखेर नाथाभाऊंनी बाजी मारली, रामराजेही जिंकले, अजित पवारांच्या सारथ्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार विजयी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागाांसाठी (Vidhan Parishad Election Result 2022) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यातल्या त्यात खास विजय आहे तो भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंचा. (Eknath Khadse) त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रामराजे निंबाळकर हेही विजयी झालेले आहेत. पण ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी आणि एकूणच इतर पक्षांसाठीही लक्षात राहिल ती एकनाथ खडसेंमुळे. कारण खडसेंच्या विजयाचे अनेक राजकीय कंगोरे आहेत. त्यांना पाडण्यासाठी भाजपानं जंग जंग पछाडलं पण त्याला खडसे पुरुन उरल्याचं दिसतंय. भाजपात झालेल्या कोंडीमुळे खडसेंनी वर्षभरापूर्वी भाजपा सोडली आणि राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीनं खडसेंचं नाव टाकलं पण अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. खडसेंची प्रतिक्षा कायम राहिली. शेवटी त्यांचा राजकीय उपयोग
पाहून राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवलं आणि त्यात ते यशस्वी झाले. विशेष म्हणजे भाजपानं खडसेंऐवजी त्यांच्या मुलीला तिकिट दिलं, त्यात रोहिणी खडसेंचा पराभव झाला. म्हणजे एकनाथ खडसेंनी दोन टप्यात अपयश पाहिल्यानंतर आता यश पाहिलंय. त्यामुळेच खडसेंसाठी ही निवडणूक अविस्मरणीय ठरली आहे.

1 मत बाद करण्यावरुन वाद

आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी कठिण गेला. कारण मतदानाची दुपारची वेळ संपेपर्यंत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती पण शेवटी त्यांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला. त्यातच पुन्हा रामराजेंच्या कोट्यातल्या एका मतावर वाद झाला. त्यामुळे राज्यसभेला जे शिवसेनेला भोगावं लागलं ते आता राष्ट्रवादीसोबत होतं की काय अशी स्थिती निर्माण झाली. पण शेवटी रामराजेंचा विजय झाला आणि राष्ट्रवादीनं आपणच राजकारणातले ‘दादा’ असल्याचं सिद्ध केलं.मत बाद करताना भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

अजित पवारांचं सारथ्य

विधान परिषदेच्या ह्या महाभारतात राष्ट्रवादीचं सारथ्य दोन नेत्यांकडे होतं. पहिले अजित पवार आणि दुसरे जयंत पाटील. दोन्ही नेत्यांनी एका एका आमदाराचं मत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खुद्द अजित पवारांनी प्रयत्न केले. मतदान झाल्यानंतर बविआच्या हितेंद्र ठाकूर यांच्यापासून ते काही अपक्षांनीही अजित दादांची भेट घेतली. एवढच नाही तर अजित पवार आणि भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचीही भेट झाली. खुद्द अजित पवारांनी स्वत:चं मत शेवटच्या टप्यात टाकलं कारण राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडूण आणण्यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत होते. जयंत पाटील आणि अजित पवार ह्या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी विशेष म्हणजे अपक्षांची मतं कशी मिळतील यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले.

काय राहिली राष्ट्रवादीची रणनिती?

राष्ट्रवादीच्यावतीनं रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे अशी दोघांना उमेदवारी दिली गेली. विधानसभेचं एकूण संख्याबळ आहे 285. त्यात ज्याही उमेदवाराला विजयी व्हायचंय, त्यासाठी कोटा होता 26 मतांचा. राष्ट्रवादीकडे एकूण मतं होती 51. म्हणजेच उमेदवाराला विजयी करण्यासाठी 1 मताची गरज. त्यातच दिवसभरात राज्यसभेप्रमाणे आजही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतावर कोर्टात लढाई लढली गेली आणि शेवटी ती राष्ट्रवादीनं हरली. देशमुख, मलिकांना अखेर मतदान करता आलंच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली. पण अजित पवार, जयंत पाटील यांनी अपक्षांच्या मतांची जुळवाजुळव करत दोन्ही उमेदवारांचा विजय सुकर केला.