नाणार प्रकल्पग्रस्त ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंकडून बैठकीचे निमंत्रण

| Updated on: Mar 07, 2021 | 5:25 PM

राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पग्रस्तांना कृष्णकुंज या निवासस्थानी बोलवले आहे. (Raj Thackeray meet Nanar Project Affected People)

नाणार प्रकल्पग्रस्त कृष्णकुंजवर, राज ठाकरेंकडून बैठकीचे निमंत्रण
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us on

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पग्रस्तांना भेटणार आहे. राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पग्रस्तांना कृष्णकुंज या निवासस्थानी बोलवले आहे. उद्या सोमवारी 8 मार्चला कृष्णकुंजवर ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Raj Thackeray will meet Nanar Project Affected People)

नाणार प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर जमीन मालकांचे म्हणणं ऐकण्यासाठी राज ठाकरे या प्रकल्पग्रस्तांना भेटणार आहे. नाणारमधील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हणाले?

या प्रकल्पाच्या विरोधात त्यावेळी असलेली स्थानिक मच्छिमारांची भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा औद्योगिकीकरणात अग्रेसर महाराष्ट्र ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही.

आज कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशाप्रसंगी राज्य ठामपणे उभे राहण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टीकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहायला हवं. या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होतील त्यात कोकणी आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांना प्राधान्य असायला हवे, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

नाणार प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती

आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा अंदाज आहे. कोरोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची ठरू शकते.

नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?

नाणार प्रकल्प हा जगातील मोठया तेलुशद्धीकरण प्रकल्पांपैकी एक असेल. त्यासाठी तब्बल 15 हजार एकर जमीन अधिग्रहीत करावी लागेल. त्यामुळे नाणारमधील 8 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी गमवाव्या लागतील. तसेच अनेक कुटुंबे विस्थापित होतील. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात आंब्याच्या, नारळी-पोफळीच्या बागा आहेत. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार नष्ट होईल. तसेच या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे समुद्राचे प्रूदषण होण्याचाही धोका आहे. परिणामी हजारो मच्छिमाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे. मात्र, आता कोरोना संकटानंतर बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने स्थानिकांच्या भूमिकेत बदल झाल्याचा दावा काहीजण बोलून दाखवत आहेत. (Raj Thackeray will meet Nanar Project Affected People)

संबंधित बातम्या : 

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा युटर्न का?; वाचा सविस्तर