“मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?

मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी धारावीत दाखल झाले. या तिघांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

मी तुम्हाला हात जोडून विनंती करते..., धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?
| Updated on: Sep 21, 2024 | 3:36 PM

Varsha Gaikwad Appeal To Dharavi People : मुंबईतील धारावी परिसरात शनिवारी सकाळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. धारावी परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक पोहोचले. या पथकाला पाहताच धारावीकरांनी आक्रमक रुप घेतले. धारावीतील काही लोकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोडही केली. यानंतर धारावी तणावाची स्थिती पाहायला मिळाली. त्यानतंर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी धारावीत दाखल झाले. या तिघांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

नेमकं काय घडलं?

धारावी परिसरात आज सकाळी एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक पोहोचले. हे पथक दाखल होताच धारावीतील स्थानिक लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. काहींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोडही केली. यानंतर काही मिनिटातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी सुरुवातीला काही लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. पण त्यानंतर काहींनी आजूबाजूला असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. काही आंदोलकांकडून धारावीतून जाणारे रस्तेही रोखण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्तात वाढ केली.

यानंतर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी धारावीत दाखल झाले. यावेळी पोलिसांनी धारावी आंदोलनकर्त्यांमधील काही आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान या आंदोलनावर तोडगा निघाला. आज कोणतीही कारवाई होणार नाही. आपल्याला ६ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत आम्ही कोर्टात जाऊ आणि तिथे न्याय मागू, असे एका आंदोलनकर्त्यांने सांगितले.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

यानंतर वर्षा गायकवाड यांनी पोलीस स्टेशनबाहेर येत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. “आत जो काही निर्णय झाला तो तुम्हाला समजलेला आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करते की कृपया शांतता ठेवा. संयम ठेवा. कारवाई रद्द करण्यात आली आहे. तुम्ही सर्व आपपल्या घरी जा. आंदोलनकर्त्यांनी एका बाजूला व्हावं, जेणेकरुन पालिकेचे अधिकारी त्यांच्या गाड्या घेऊन जातील. जोपर्यंत तुम्ही रस्ता मोकळा करुन देणार नाही, तोपर्यंत त्यांची गाडीही तिथेच उभी असेल. त्यामुळे तुम्हीही सहकार्य करा”, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

“मी हात जोडून तुम्हाला सांगतेय, महापालिकेचे अधिकारी इथून जात आहेत. त्यांना इथून व्यवस्थित जाऊ द्या. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. आपण सर्व या विषयावर तोडगा काढू. त्यामुळे शांतता ठेवा. मी इथे आहे, पोलीस इथे आहेत. त्यामुळे इतका विश्वास ठेवा आणि घरी जा. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुमची मदत होणं गरजेचे आहे”, असेही वर्षा गायकवाड या म्हणाल्या.

मुंबई पोलिसांकडूनही आवाहन

यानंतर पोलिसांनीही धारावीकरांना शांत राहण्याचे आवाहन केले. धारावीत सध्या जी काही तणावपूर्ण परिस्थिती आहे, ती सामान्य होण्यासाठी तुम्हाला रस्ता मोकळा करुन द्यावा लागेल. त्याशिवाय या पालिकेच्या गाड्या जाणार नाहीत. तुम्ही घरी जा, असे मुंबई पोलीस यावेळी म्हणाले. यानंतर काही वेळाने धारावीतील तणावपूर्ण परिस्थिती निवळली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us