
मुंबई शहरात पावसाळा संपून आता थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी मुंबईत गुलाबी थंडी पडलेली असताना आता मुंबईकरांना वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई शहराच्या हवेच्या गुणवत्तेत (AQI) मोठी घट नोंदवली गेली आहे. आज सकाळी शहराच्या अनेक भागांत दाट धुकं पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे संपूर्ण शहरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबईचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १०६ ते १६० दरम्यान नोंदवला गेला आहे. जो मध्यम (Moderate) श्रेणीत येतो. तर शनिवारी हा AQI १०४ नोंदवला गेला होता. तसेच एका एजन्सीच्या अहवालानुसार, शनिवारी मुंबईचा AQI १४२ होता. ज्यामुळे मुंबई शहर जगातील नववे सर्वात प्रदूषित शहर ठरले होते.
| विभाग | AQI (अंदाजित) | श्रेणी |
| बीकेसी (BKC) | 222 | खराब (Poor) श्रेणीजवळ |
| घाटकोपर | 164 | मध्यम |
| नवी मुंबई | 129-177 | मध्यम (काही ठिकाणी Unhealthy) |
| ठाणे | 122 | मध्यम |
| माझगाव | 120-176 | मध्यम |
| अंधेरी | 116-154 | मध्यम (काही ठिकाणी Unhealthy) |
गेल्या काही दिवसांत पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. ऑक्टोबर महिन्यातील बहुतांश दिवस मुंबईतील हवा चांगल्या श्रेणीत नोंदली गेली होती. मात्र आता थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, थंडी जशी वाढेल, तसा हवेतील प्रदूषणाचा स्तरही वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईच्या अनेक भागांतील हवा मध्यम (Moderate) वरून वाईट (Poor) श्रेणीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.