मुंबईतल्या नाल्यांमधून हाजीअलीपर्यंत वाहत गेलेल्या ‘त्या’ मृतदेहाचा चौकशी अहवाल समोर, मृत्यूचं गूढ मात्र कायम

| Updated on: Oct 28, 2020 | 2:17 PM

तिथले झाकणही निघालेले नाही, असा महापालिकेच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Mumbai BMC Inquiry report woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

मुंबईतल्या नाल्यांमधून हाजीअलीपर्यंत वाहत गेलेल्या त्या मृतदेहाचा चौकशी अहवाल समोर, मृत्यूचं गूढ मात्र कायम
Follow us on

मुंबई : घाटकोपरमधील असल्फा इथून एक महिला गटारातून वाहून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी चौकशीसाठी मुंबई महापालिकेने समिती नेमली होती. या समितीने नुकतंच त्यांचा अहवाल सादर केला आहे. मात्र अहवालात काहीही निष्पन्न न झाल्याची बाब समोर आली आहे. (Mumbai BMC Inquiry report woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 ऑक्टोबरला 32 वर्षीय शीतल दामा ही महिला झाकण उघड्या असलेल्या गटारात पडल्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली होती. यानंतर 4 ऑक्टोबरला तिचा मृतदेह हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला होता.

या प्रकरणी चौकशी अहवालात महिला गटारात पडल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. तसंच जिथं महिला पडल्याचे सांगितले जात होते. तिथले झाकणही निघालेले नाही, असा महापालिकेच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तसेच घटनास्थळावरुन याप्रकरणी सीसीटीव्ही उपलब्ध झाला नाही किंवा एकही प्रत्यक्षदर्शी मिळाला नाही. त्या गटारीचा प्रवाह हा माहीमकडे जातो. पण तो मृतदेह हा हाजीअलीला कसा गेला?  असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

दरम्यान याप्रकरणी मुंबई महापालिका आता अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवणार आहे. त्यामुळे आता शीतल दामा यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. पालिकेच्या अहवालात काहीही समोर न आल्याने पुढील तपास पोलीस करतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

घाटकोपरच्या असल्फा भागातील गटारातून शितल दामा नावाची एक 32 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास शितलचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला. असल्फा ते हाजीअली दरम्यान जवळपास 20 ते 22 किमीचं अंतर आहे. एवढ्या लांब नाल्यातून मृतदेह कसा वाहून गेला, असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.

हा मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या लांब अंतरापर्यंत जाणं शक्यच नाही असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकड़ून सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर, महापालिकेनं पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या आणि ग्रील्स लावल्या आहेत. त्यामुळे महिलेचा मृतदेह वाहून जाऊच शकत नाही, असा दावा पालिकेनं केला होता. (Mumbai BMC Inquiry report woman dead body drawn from ghatkopar to haji ali)

संबंधित बातम्या : 

कसं शक्य आहे? मुंबईतल्या नाल्यांमधून महिलेचा मृतदेह हाजीअलीपर्यंत वाहत गेला