समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? समीर वानखेडेंच्या तपासात अनियमितता, कठोर कारवाईचे निर्देश

| Updated on: May 28, 2022 | 11:16 AM

Aryan Khan Drugs Case : चौकशी समिती त्यांची पगारवाढ रोखण्यासोबत त्याना बडतर्फ करण्याची मागणी देखील करु शकते. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांच्यासह त्यांची टीममधील अनेकांच्या अडचणीही वाढू शकतात

समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? समीर वानखेडेंच्या तपासात अनियमितता, कठोर कारवाईचे निर्देश
वानखेडेंची नोकरी जाणार?
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : किंगखान शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मुलाला शुक्रवारी ड्रग्जप्रकरणी क्लीनचीट मिळाली. त्यानंतर आता एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे  (Sameer Wankhede)यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताय. कारण केंद्र सरकारनं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. एनसीबीनं कॉर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारीनंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर आर्यन खानला एनसीबीनं आपल्या ताब्यात ठेवलं होतं. दरम्यान, आर्यन खानकडे ड्रग्ज (Aryan Khan Drug Case) आढळून आलं नसल्याचं आरोपपत्रातून स्पष्ट करण्यात आलंय. आर्यन खानसह एकूण सहा जणांना पुराव्यांअभावी क्लीनचीट देण्यात आली. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून सातत्यानं केला गेला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी आरोपांची राळ उठवली होती. अखेरीस एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली.

शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आलं. सहा हजार पानी आरोपपत्रात आर्यन खानकडे ड्रग्ज नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला निर्दोष सोडण्यात आलंय. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या नोकरीवरुन आता सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

एसआयटीचा अहवाल काय सांगतो?

एसआयटीनं दिलेल्या अहवालात अनेक बाबी अधोरेखित केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे समीर वानखेडे यांच्याकडून अनेक तांत्रिक चुका झाल्या असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच आर्यन खान विरोधात कोणताही ठोस पुरावा तपासात आढळून आला नाही, असंही अहवालात म्हटलंय. एसआयटीनं दिलेल्या अहवालाची गंभीर दखल केंद्राकडून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारानं केंद्रीय अर्थ मंत्रालयाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

वानखेडेंची नोकरी जाणार?

आर्यन खान ड्रग्जप्रकरणात तपास अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांची आता नोकरी जाणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, तूर्तास त्यांना पदावरुन हटवण्याची येण्याची शक्यता असल्याचं, केंद्र सराकरमधील सूत्रांनी म्हटलंय. त्यानंतर समीर वानखेडे यांची चौकशी केली जाईल. या चौकशीत जर वानखेडे यांनी सहकार्य केलं नाही आणि समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. इतकंच काय तर चौकशी समिती त्यांची पगारवाढ रोखण्यासोबत त्याना बडतर्फ करण्याची मागणी देखील करु शकते.

आर्यन खानवर फडणवीसांची प्रतिक्रिया : पाहा Video

विशेष म्हणजे समीर वानखेडे यांच्यासह त्यांची टीममधील अनेकांच्या अडचणीही वाढू शकतात, असंही बोललं जातंय. एनसीबीवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही चौकशी एसआयटीकडून केली जाते आहे. याप्रकरणात काही तत्थ आढळलं, तर त्याची चौकशी सीबीआयकडेही सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्याबाबत नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

यापूर्वी एसआयटीच्या चौकशी अहवालातही मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या वानखेडे यांना एनसीबीतून हटवण्यात आले असून त्यांची रवानगी त्यांचे मूळ केडर असलेल्या डीआरआयमध्ये करण्यात आलेली आहे. या एसआयटीच्या तपासात अनेकदा समीर वानखेडे यांची साक्षही नोंदवण्यात आलेली आहे. या प्रकरणात एसआयटीने या प्रकरणातील आरोपी, साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीही नोंदवलेल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने क्रूजवर धाड टाकली होती. ड्रग्जप्रकरणी केलेली ही कारवाई अनेक महिने चर्चेत होते. या कारवाईदरम्यान, क्रूजवरील एकूण 20 लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. शाहरुख खानचा मुलगा असलेल्या आर्यन खानसह अवीन साहू आणि अन्य 4 आयोजकांविरुद्ध पुरेशा पुराव्याअभावी कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असं आरोपपत्रात म्हटलंय. दरम्यान, एनसीबीनं आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडी ठेवलं होतं. यावरुन राजकारणही तापलं होतं.

दरम्यान, इतर 14 जणांवर सध्या आरोप निश्चित करण्यात आलेत. या कारवाईसाठी एनसीबीचे 22 अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेलेले होते. तर एकूण 1800 प्रवासी क्रूझवर होते. वेगवेगळ्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांना या प्रकरणाच्या तपासातून बाजूला करण्यात आलेलं होतं.