हातातून सर्व निसटू नये म्हणून लोकल बंदचा निर्णय : मुंबईचे पालकमंत्री

| Updated on: Mar 22, 2020 | 2:58 PM

कोरोनामुळे परिस्थिती हातातून निसटू नये म्हणून लोकल बंदचा (Mumbai Local lockdown) निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलं.

हातातून सर्व निसटू नये म्हणून लोकल बंदचा निर्णय : मुंबईचे पालकमंत्री
Follow us on

मुंबई : कोरोनामुळे परिस्थिती हातातून निसटू नये म्हणून लोकल बंदचा (Mumbai Local lockdown) निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलं. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकल ट्रेन आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. यावर अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Mumbai Local lockdown).

अस्लम शेख नेमकं काय म्हणाले?

“गेल्या एक आठवड्यापासून आम्ही लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं निवेदन करतोय. आम्ही लोकांना वारंवार आवाहन करतोय. मात्र, लोक अजूनही या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीत. कोरोनाची ही तिसरी स्टेज आपल्या हातातून निघून गेली तर फार मोठी चूक होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला”, असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.

“कोरोनावर आता ताबा नाही मिळवला तर भविष्यात आपल्याला परिस्थिती हाताळायला कठीण जाईल. युरोपीय देश, इटली, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांचं या आजारावरील नियंत्रण सुटलं आहे. त्यामुळे तिथे महामारी सुरु झाली आहे. आपल्या देशात आतापर्यंत आपण नियंत्रण मिळवत आहोत. परंतु आणखी काही लोक विदेशातून आले आहेत. त्यांनी ऐकलं नाही आणि ते फिरत राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जावू शकते”, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.

“पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला. आज 90 टक्के लोकांनी बंद पाळला. मात्र, तरीसुद्धा आज सकाळपासून काही लोक घराबाहेर पडले. आम्ही त्यांना थांबवण्यासाठी रेल्वे स्टेशन, ठिकठिकाणी पोलीस, अधिकारी ठेवले. तरीही लोक ऐकत नाहीत”, अशी खंत अस्लम शेख यांनी व्यक्त केली.

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूंचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून सर्व लोकल ट्रेन, प्रिमिअम ट्रेन्स, मेल, एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर ट्रेन, कोकण रेल्वे, कोलकाता मेट्रो ट्रेन आज मध्यरात्री पासून बंद ठेवल्या जाणार आहेत.

दरम्यान, ज्या ट्रेन किंवा एक्सप्रेस या संध्याकाळी 4 पूर्वी निघाल्या असतील त्या ट्रेन सुरु राहणार आहेत. तर देशात इतर ठिकाणी गरजेच्या वस्तू ने-आण करण्यासाठी मालगाड्या मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच, ज्या प्रवाशांनी तिकिटांचे बुकिंग केले असेल त्यांना पूर्ण पैसे रिफंड करण्यात येतील.

संबंधित बातमी : कधीही न थांबणारं शहर आज स्तब्ध, धैर्याने लढूया, पालकमंत्र्यांचं मुंबईकरांना भावनिक आवाहन