
राज्यतील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. विशेषतः देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाची अनेक दशकांची सत्ता मोडीत निघाली आहे. मात्र, आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या खुर्चीवर लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळाल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या आहेत. भाजपला महापौर बसवण्यासाठी आणखी २५ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरताना दिसत आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाने आता मुंबईच्या महापौरपदावर दावा केला आहे. आम्हाला अडीच वर्षे महापौर पद द्या, अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. शिंदे गटाने अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा फॉर्म्युला सुचवला आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे यावर कोणतीही घोषणा झालेली नाही. सध्या शिंदे गटात या पदासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये किंवा ती टाळली जावी यासाठी शिंदे गटाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्कामी ठेवले आहे. पक्षाकडून ट्रेनिंगसाठी नगरसेवकांना बोलवलं असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीमधील अंतर्गत वाटाघाटी पूर्ण होईपर्यंत हे नगरसेवक तिथेच राहण्याची शक्यता आहे.
त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) वार्षिक परिषदेसाठी रवाना झाले आहेत. राज्यासाठी जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, हा दौऱ्याचा उद्देश आहे. येत्या २५ जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस मुंबईत परतणार आहेत. मुंबईच्या महापौरपदाचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतरच घेतला जाईल, असे म्हलटे जात आहे. त्यामुळे येत्या २५ जानेवारीला मुंबई महापौर पदाचा अंतिम निर्णय होईल, असे म्हटले जात आहे. यामुळे मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी किमान आठवडाभराची वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान निवडणूक निकालानंतर शनिवारी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थितीत होते. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली. एकनाथ शिंदे यांनी आजारपणामुळे बैठकीला दांडी मारल्याचे सांगण्यात आले. मात्र ही अनुपस्थित इतर राजकीय कारणांमुळे असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.