तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !

मुंबई पोलिसांनी तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षीय मुलाला कुटुंबाकडे सुपूर्द केले आहे. एमआयडीसी पोलीस पथकाने तांत्रिक तपास, अनाथालयांना भेटी आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर अनिस खानला शोधून काढले. दोन वेगवेगळ्या नावांची आव्हाने असूनही, त्यांची चिकाटी आणि संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला त्यांचा हरवलेला मुलगा परत मिळाला, ज्यामुळे पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !
एमआयडीसी पोलिसांमुळे तीन वर्षांनी सापडला बेपत्ता मुलगा, कुटुंबियांशी अखेर भेट
| Updated on: Jul 23, 2026 | 10:52 AM

लोकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या मदतीसाठी पोलिस नेहमी तत्पर असतात, अनेकदा ते दिसूनही येतं. असाच एक अनुभव समोर आला असून मुंबई पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला त्यांचा बेपत्ता मुलगा परत मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सतर्कता पथकाने अत्यंत चिकाटी, तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर 2023 मध्ये बेपत्ता झालेल्या 8 वर्षीय मुलाला सुखरूप शोधून काढलं आणि त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. या यशस्वी कारवाईमुळे मुंबई पोलिसांच्या संवेदनशीलतेचे आणि तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडलं असून त्यांचं कौतुक होत आहे.

3 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता मुलगा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 22 ऑक्टोबर 2023 रोजी घडली होती. अंधेरी पूर्व येथील स्नेह सदन बाल अनाथालयातून 8 वर्षीय अनिस खान अचानक बेपत्ता झाला होता. याबाबत अनाथालयातील कर्मचारी चंचल प्रसाद नायर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. त्याचदरम्यान पोलिसांना समजलं की, अनिसला काही दिवसांपूर्वी जुहू चौपाटी परिसरात बेवारस अवस्थेत फिरताना जुहू पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे 21 ऑक्टोबर 2023 रोजी त्याला स्नेह सदन बाल अनाथालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तो तेथून गायब झाला.

दोन नावांमुळे तपासासमोर मोठं आव्हान

या प्रकरणातील सर्वात मोठी अडचण म्हणजे मुलाची ओळख. वेगवेगळ्या ठिकाणी त्याची नोंद दोन वेगवेगळ्या नावांनी झाली होती. एका ठिकाणी तो अनिस खान, तर दुसऱ्या ठिकाणी अमन शेख या नावाने नोंदवला गेला होता. मात्र त्या मुलाकडे कोणतेही ओळखपत्र किंवा नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध नव्हती. यामुळेच तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.

विशेष पथकाने नव्याने सुरू केला तपास

तरीही हार न मानता, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस उपायुक्त, पश्चिम परिमंडळ-10 यांच्या आदेशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले. पीएसआय सागर हुजरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची सूत्रं हाती घेतली.
पोलिसांनी CCTNS, ICJS पोर्टल, मिसिंग पर्सन सर्च सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 यांचा वापर करून हरवलेल्या मुलांच्या नोंदी तपासल्या. यासोबतच मुंबईतील विविध बाल अनाथालये आणि बालगृहांना भेटी देऊन 2023 पासून दाखल झालेल्या 8 ते 13 वयोगटातील मुलांची माहिती गोळा करण्यात आली.

तो फोटो ठरला महत्वाचा पुरावा

या प्रकरणाच्या तपासादरम्यान माटुंगा येथील बाल सुधारगृहात ‘अमन शेख’ या नावाने दाखल असलेल्या एका मुलाचा फोटो पोलिसांच्या हाती लागला. तोच फोटो क्लू ठरला कारण, फोटो पाहिल्यानंतर तो मुलगा बेपत्ता अनिस खान असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी मालवणी परिसरातील त्याच्या संभाव्य नातेवाईकांशी संपर्क साधला. फोटो दाखवताच नातेवाईकांनी मुलाची ओळख पटवली आणि तो त्यांचा भाचा असल्याचे सांगितलं. अखेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनिसला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले

तब्बल 3 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणाचा यशस्वी तपास करत एमआयडीसी पोलिसांनी एका मुलाला त्याचं कुटुंब पुन्हा मिळवून दिलं. तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे आणि मुलाला कुटुंबाशी पुन्हा भेट करून दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Follow Us