महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांची पत्राद्वारे भावनिक साद!

| Updated on: Dec 06, 2020 | 1:05 PM

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनी आपल्या भावना पत्राद्वारे मांडा असं आवाहन विश्वशांती सामाजिक संस्थेकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो अनुयायांनी आपल्या भावना पत्राद्वारे मांडल्या आहेत.

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांची पत्राद्वारे भावनिक साद!
Follow us on

मुंबई: कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्याऐवजी पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा असं आवाहन विश्वशांती सामाजिक संस्थेकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारो पत्र दादर पोस्ट ऑफिसमध्ये आले आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या हजारो अनुयायांनी पत्राद्वारे आपल्या भावना महामानवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. (Thousands of followers greet Dr. Babasaheb Ambedkar by letter)

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेबांचे लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. मात्र, सध्या देशावर कोरोनाचं संकट आहे. अशावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून अनुयायांना चैत्यभूमीवर न येण्याची विनंती करण्यात आली होती. तसंच महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीचं दर्शन सह्याद्री वाहिनीवर आपण करु शकाल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यानुसार आज चैत्यभूमीवरील महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम शांततेत आणि मुख्यमंत्र्यांसह अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

कोरोनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आज चैत्यभूमीवर येऊ शकले नाहीत. पण विश्वशांती सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून त्यांच्या भावना चैत्यभूमीपर्यंत पोहोचल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातून हजारो पत्र दादर पोस्ट ऑफिसमध्ये दाखल झाली आहे. या पत्रांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांनी महामानवाला वंदन केलं. सोबतच आपल्या भावनाही प्रकट केल्या आहे.

विश्वशांती सामाजिक संस्थेचं आवाहन

महापरिनिर्वाण दिनी आपल्या भावना पत्राद्वारे मांडा असं आवाहन विश्वशांती सामाजिक संस्थेकडून करण्यात आलं होतं. ज्यांना कोरोना महामारीच्या काळात खेडेगाव, तालुका, जिल्हा, आणि अन्य राज्यातून चैत्यभूमी येथे येऊन आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करता येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी विश्वशांती संस्था बाबासाहेबांप्रती असलेल्या आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त कराव्या, असं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनानंतर आलेली सर्व पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर अर्पण करण्यात आली आहेत.

जयंत पाटलांचंही डॉ. आंबेडकरांना पत्र

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातील मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.

जयंत पाटील यांचे पत्र 

प्रिय बाबासाहेब,

“देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत.म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!,” असे जयंत पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

संबंधित बातम्या:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा, कधी होणार स्मारकाचं लोकार्पण?

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत, जयंत पाटलांचे बाबासाहेबांना पत्र

Thousands of followers greet Dr. Babasaheb Ambedkar by letter