
राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाची मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर नुकतीच विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. मतदारांची नावे नोंदवण्यासाठी हिरवा पेन आणि नावे वगळण्यासाठी लाल पेन वापरण्याचे वरुन आदेश असल्याचा खळबळजनक दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीदरम्यान नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली. सोयीचे नावे हिरव्या पेनाने मार्क करा आणि गैरसोयीची नावे लाल पेनाने मार्क करण्याचे आदेश देण्यात आले आणि नावे डीलिट केली असा आरोप जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांना बासनात गुंडाळल्याचाही आरोप केला. यावेळी त्यांनी अनेक पुरावेही सादर केले.
आम्ही १९ ऑक्टोबरला कार्यालयात नेऊन पत्र दिलं. आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाड भेटले. पण त्याची दखल घेतली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला एक महिना आधी विधानसभेच्या पत्र दिलं होतं. नालासोपारा येथील सुषमा गुप्ता प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले की, १२ ऑगस्टची घटना आहे. निवडणूक आयोगाने याची साधी चौकशीही केली नाही. मुरबाड मतदारसंघात घरासमोर फक्त ‘डॅश’ लिहिलेली ४०० घरे आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ८६९ मतदार एकाच ठिकाणी आहेत, तर मध्य नाशिकमध्ये ३८२९ क्रमांच्या घरात ८१३ मतदार आहेत. “हे सर्व पुरावे आहेत. मी हवेत बोलत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघातील एका घटनेचा उल्लेख करताना जयंत पाटील यांनी गंभीर माहिती दिली. पवार यांनी हरकतीमध्ये घर क्रमांक एक दाखवला, ज्यात १८८ मतदार दाखवले होते, पण ते घर गावातच नव्हते. यावर तक्रार केल्यावर मतदाराची प्रायव्हसी डिस्टर्ब होते म्हणून माहिती देऊ शकत नाही,” असे उत्तर निवडणूक अधिकाऱ्याने दिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. ही भाजपच्या विरोधातील मोहीम नाही. भाजपच्या प्रवक्त्यांनी उत्तरे देऊ नये. मतदार याद्यात दुसरा कोणी तरी नाव घालतो. नाव काढतो. कुणी तरी बाहेरचा व्यक्ती सिस्टिम ऑपरेट करतो. राज्य निवडणूक आयोगाच्या हातात यंत्रणा राहिली नाही, असा आमचा समज झाला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.