आता कोणीच रोखू शकत नाही, औरंगाबादचं नाव ‘छत्रपती संभाजीनगर’! कारण….

| Updated on: Feb 24, 2023 | 7:56 PM

महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. याच बातमीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

आता कोणीच रोखू शकत नाही, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर!  कारण....
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून (Delhi) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. औरंगाबादसह उस्मानाबाद (Osmanabad) शहराचं नाव धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. या दोन्ही शहरांच्या नव्या नावांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला. अखेर केंद्र सरकारने दोन्ही नावांच्या नामांतरासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव असं म्हटलं जाणार आहे. सर्व शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख केला जाईल.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं, अशी मागणी केलेली. बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 8 मे 1988 रोजी सभा झालेली. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतची मागणी केलेली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून ही मागणी लावून धरण्यात आली होती. औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटायचं. अखेर राज्य सरकारने याबाबत निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील नामांतराला मंजुरी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे सरकारने आधी निर्णय घेतला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंडखोरी केली आणि ते 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकी घेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबद्दल निर्णय घेतलेला. त्यानंतर काही दिवसांत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.

शिंदे-फडणवीस सरकारकडून पुन्हा निर्णय

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात नव्याने अस्तित्वात आले. त्यावेळी नव्या सरकारच्या झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत नामांतराबद्दलचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारने राजीनाम्याआधी घाईत निर्णय घेतला. त्यामुळे तांत्रिक अडचणींचे कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा त्याबाबतचा निर्णय घेतला.

राज्य सरकारने नामांतराबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दलचा प्रस्ताव केंद्रात पाठवण्यात आलेला. अखेर तो प्रस्ताव केंद्र सरकारकडून देखील मान्य करण्यात आलाय. त्यामुळे औरंगाबाद शहराला आता छत्रपती संभाजीनगर हे नवं नाव मिळालं आहे आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव हे नाव मिळालं आहे.

नामांतराला अनेकांचा विरोध

औरंगाबादच्या नामांतराला अनेकदा विरोध झाला. वेगवेगळे पक्ष आणि संघटनांकडून याबाबत विरोध करण्यात आलेला. या विरोधात आधी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षही होते. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन्ही पक्षांनी नामांतराला विरोध केला नाही. दुसरीकडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध केलेला. पण विरोधकांचा सर्व विरोध झुगारुन सरकारने अखेर नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेतला.