‘एनआयए’ने तपास पूर्ण करुन बोलावं, विनाकारण रोज बातम्या पसरवू नयेत: जयंत पाटील

| Updated on: Mar 16, 2021 | 2:49 PM

केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केलं, ते केलं, अशा बातम्या सोडू नयेत. | Jayant Patil NIA

एनआयएने तपास पूर्ण करुन बोलावं, विनाकारण रोज बातम्या पसरवू नयेत: जयंत पाटील
सगळ्या जेव्हा पुराव्याआधारे 'एनआयए'ने निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Follow us on

मुंबई: अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या चौकशीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवू नयेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. (NCP leader Jayant Patil on Sachin Vaze investigation)

जयंत पाटील यांनी मंगळवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केलं, ते केलं, अशा बातम्या सोडू नयेत. या सगळ्या जेव्हा पुराव्याआधारे ‘एनआयए’ने निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

सत्तेबाहेर असल्यामुळे नारायण राणेंची तडफड सुरु आहे: जयंत पाटील

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भातही जयंत पाटील यांनी भाष्य केले. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असे झाले आहे. त्यामुळे काहीही झालं की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करता. हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

‘फडणवीसांनी विरोधी पक्षात बसण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी’

राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते सातत्याने सरकार पडणार, अशा वल्गना करत आहेत. या अधिवेशनात भाजप पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला. देवेंद्र फडणवीस यांना खात्री झाली आहे की, आपल्याला पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षातच बसायचे आहे. त्यानुसार त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडली. हे त्यांनी नेहमी करावं, विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
तसेच महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. शिवसेनेकडून सचिन वाझे यांना पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याने चूक केले त्याला शिक्षा होणारच, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

LIVE | बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर काहीही चर्चा झाली नाही : जयंत पाटील

स्कॉर्पिओ, इनोव्हाच्या दोन्ही ड्रायव्हरचा शोध लागला, दोघांचंही वाझेंशी कनेक्शन?

अंबानी स्फोटक प्रकरणात स्कॉर्पिओ ,इनोव्हा चालकाचा शोध लागला, सूत्रांची माहिती

(NCP leader Jayant Patil on Sachin Vaze investigation)