Rajya Sabha Election: नवाब मलिक, देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?; राष्ट्रवादी कोर्टात दाद मागणार

| Updated on: Jun 01, 2022 | 11:33 AM

Rajya Sabha Election: अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावं म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहोत, असं पटेल यांनी सांगितलं.

Rajya Sabha Election: नवाब मलिक, देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?; राष्ट्रवादी कोर्टात दाद मागणार
नवाब मलिक, देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?; राष्ट्रवादी कोर्टात दाद मागणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) होत आहे. ही निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी चुरस वाढणार आहे. सहाव्या जागेसाठी एक एक मतदान अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडी (maha vikas aghadi) आणि भाजपची (bjp) सर्व मदार अपक्षांवर आहे. जास्तीत जास्त अपक्ष आपल्यासोबत राहावेत म्हणून दोन्ही पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, असं असताना दुसरीकडे महाविकास आघाडीला दुसरी चिंता सतावत आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची. हे दोन्ही नेते तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून आम्ही आवश्यक कार्यवाही करणार आहोत, असं स्पष्ट केलं. तसेच याबाबत आम्ही कोर्टात धाव घेणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं.

प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावं म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहोत, असं पटेल यांनी सांगितलं. मलिक आणि देशमुख यांना मनीलॉन्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. दोघेही ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.

हे सुद्धा वाचा

भुजबळ, कदमांनाही परवानगी मिळाली होती

यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम हे सुद्धा तुरुंगात होते. तेव्हा राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची मुभा देण्यात आली होती. जुलै 2017मध्ये ही निवडणूक पार पडली होती. त्यावेळी रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते आणि ते विजयी झाले होते.

अन् भुजबळ मंत्री झाले

त्यावेळी भुजबळही न्यायालयीन कोठडीतच होते. त्यांच्याविरोधात ईडीने मनी लॉन्डरींग प्रकरणात गुन्हे दाखल केले होते. तर रमेश कदम यांना घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेली होती. भाजपच्या काळातच भुजबळांना अटक झाली होती. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येताच त्यांना अन्न व नागरी पुरवठा हे खातं देण्यात आलं.

एक एक मत महत्त्वाचे

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आता एक एक मत महत्त्वाचे झाले आहे. एक मत जरी कमी पडलं तरी उमदेवार पडू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपने सातवा उमेदवार मिळाल्याने सहाव्या जागेसाठी अत्यंत चुरस वाढली आहे. त्यामुळेच मलिक आणि देशमुख यांना मतदानासाठी आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी कोर्टात जाण्याची तयारीही राष्ट्रवादीने सुरू केली आहे. त्यामुळे मलिक आणि देशमुख मतदानासाठी बाहेर येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.