मुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू?; नितेश राणेंचा मोठा आरोप

| Updated on: Jul 24, 2021 | 12:22 PM

राज्यात सुरू असलेल्या संकटाच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (nitesh rane)

मुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू?; नितेश राणेंचा मोठा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितेश राणे
Follow us on

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या संकटाच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू चालत असल्याचं आम्ही ऐकतोय, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. (nitesh rane attack on cm uddhav thackeray over flood in maharashtra)

महाडच्या तळीये आणि साताऱ्यातील आंबेघर येथे दरड कोसळून प्रचंड जीवितहानी झाली. तर चिपळूण, महाड, कोल्हापूर आणि सांगलीला पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. महाराष्ट्रावर एकामागून एक संकटाची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी खोचक ट्विट करतानाच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो. तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

 

मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा

नितेश राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये थेट मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून या नागरिकांसाठी खूप उशिराने मदत मिळाली आहे. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पुरातून बाहेर काढण्यासाठी बोटी पाठवण्यात आल्या नाहीत. अधिकारी नेटवर्कमध्ये नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

महाडमध्ये काय घडलं?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत. (nitesh rane attack on cm uddhav thackeray over flood in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

Taliye landslide: तळीयेत 35 महिला, 10 मुलांसह 50 जण अजूनही बेपत्ता; जिल्हाधिकारी निधी चौधरी घटनास्थळी

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

Maharashtra Rain Landslides LIVE | सांगलीकरांनो आणखी पाणी पातळी वाढणार, 10 हजार लोक स्थलांतर

(nitesh rane attack on cm uddhav thackeray over flood in maharashtra)