“राहुल गांधींच्या फोन हॅकिंगमध्ये अझरबैजान आणि रवांडा सरकारचा हात”, नितीन राऊतांकडून मोदी सरकारची खिल्ली

| Updated on: Jul 21, 2021 | 9:10 PM

राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी पेगेसस मालवेअरच्या माध्यमातून हेरगिरीप्रकरणी ट्विट करत मोदी सरकारची खिल्ली उडवलीय.

राहुल गांधींच्या फोन हॅकिंगमध्ये अझरबैजान आणि रवांडा सरकारचा हात, नितीन राऊतांकडून मोदी सरकारची खिल्ली
Follow us on

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी पेगेसस मालवेअरच्या माध्यमातून हेरगिरीप्रकरणी ट्विट करत मोदी सरकारची खिल्ली उडवलीय. यात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा फोन टॅप करण्यात अझरबैजान आणि रवांडाच्या सरकारांचा हात असल्याचा उपरोधात्मक आरोप करत खिल्ली उडवलीय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “माझी हळूहळू खात्री पटत चालली आहे की अझरबैजान आणि रवांडाच्या सरकारांनी राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांचे फोन टॅप केले होते.”

इतकंच नाही तर नितीन राऊत यांनी कर्नाटकमधील सरकार पाडण्याच्या प्रकारावरुनही भाजपवर निशाणा साधलाय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी कर्नाटकात कुमारस्वामी सरकार पाडण्यात मोरोक्कोचा हात होता, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला. राऊत यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी पेगासस हा हॅशटॅगही वापरला.

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, काँग्रेसचा मोठा आरोप

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आलं. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना हा बॉम्ब टाकला. फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने याचा गैरवापर केला. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

उद्या राजभवनाबाहेर निदर्शने

पॅगेसास प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी उद्या गुरुवारी आम्ही राजभवनाबाहेर धरणे धरणार आहोत. याप्रकरणी राज्यपालांना निवेदन देणार आहोत. या प्रकरणात राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

चौकशी समिती स्थापन करा

विधानसभेत मी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. माझेही फोन टॅप करण्यात आले होते. त्यावर सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने ही समिती लवकर स्थापन करावी आणि या प्रकरणाची माहिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

पेगेसस काय आहे? व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, काँग्रेसचा मोठा आरोप

पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर, केंद्राच्या संमतीशिवाय हल्ला होऊच शकत नाही, सामनातून मोदी-शहांवर वार

“नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींच्या मदतीने इम्रान खान यांचा फोन हॅक केला”, पाकिस्तानच्या मंत्र्याचा आरोप

Nitin Raut allegations over Pegasus malware use Phone tapping Rahul Gandhi