पावसामुळे रेल्वे रद्द, 5000 प्रवासी मुंबईत अडकले, कोकणाचाही संपर्क तुटला

| Updated on: Aug 04, 2019 | 8:41 PM

राज्यभरात पावसाने थैमान घातले असून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन (LTT) जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे तब्बल 5000 प्रवासी एलटीटी स्थानकावर अडकले आहेत.

पावसामुळे रेल्वे रद्द, 5000 प्रवासी मुंबईत अडकले, कोकणाचाही संपर्क तुटला
Follow us on

मुंबई : राज्यभरात पावसाने थैमान घातले असून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन (LTT) जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे तब्बल 5000 प्रवासी एलटीटी स्थानकावर अडकले आहेत.

मध्य रेल्वेप्रमाणे कोकण रेल्वेची वाहतूक देखील बंद झाली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने पुढील 24 तासांसाठी हा निर्णय घेतला. मध्य रेल्वेच्याही 57 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 30 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठल्याने मध्य रेल्वेने रोह्यापासून मुंबईपर्यंतची वाहतूक बंद केली. अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद केली. त्यामुळे या मार्गावर आता कोणतीही रेल्वे गाडी धावणार नाही. कोकण कन्या, तुतारी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्यगंधा एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर, डबल डेकर, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.

मध्य मार्गावर कर्जत दिशेला शेलु आणि नेरळदरम्यान रुळाखालील खडी वाहून गेली. त्यामुळे डीएसबी (DSB Box), सिग्नल यंत्रणेशी संबंधित भाग वाहून बाजूला गेला. तसेच ओव्हर हेड वायर पकडून धरणारा खांबही झुकल्याने वाहतूक खोळंबली. आता वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यासाठी रात्र होण्याची शक्यता आहे.

पालघर-मनोर रस्त्यावरील वाहतूक बंद

सूर्या नदी दुथडी वाहत असून या नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी किनारी भागातील  गावांमध्ये शिरले आहे. हेच पाणी पालघर ते मनोर रोडवरील काजुपाडा येथे शिरल्याने  रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे रस्त्यावरील ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे पालघरकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनोरकडून आणि पालघरकडून येणारी सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावरून पालघरकडे येणारी वाहतूक सफाळामार्गे, तर नागझरीमार्गे धीम्या गतीने सुरू आहे. असे असले तरी प्रशासनामार्फत अजूनही काही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.