उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं, आता देशालाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत

| Updated on: Apr 28, 2021 | 2:06 PM

कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. | Sanjay Raut CM Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं, आता देशालाही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व सूत्रे हातात घेतली. त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेलत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. तसेच आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले. (CM Uddhav Thackeray successfully handled coronavirus second wave in Maharashtra)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

कोरोनामुळे देश 20 वर्षे मागे पडलाय: राऊत

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, गेल्या पाच-दहा वर्षात देश किती पुढे गेला हे माहिती नाही. पण कोरोना संकटामुळे देश 20 वर्षे मागे गेला आहे. देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘रेमडेसिविर इंजेक्शन्स सरकारच्या माध्यमातूनच गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजेत’

सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होताना दिसत आहे. हा काळाबाजार सरकार करत नाही. अहमदनगरमधील एका नेत्यानेही अशाचप्रकारे इंजेक्शन्स आणली. तो विषय वेगळा आहे. तरीही रेमडेसिविर इंजेक्शन्स ही सरकारच्या माध्यमातूनच गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या:

मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जातोय; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा; ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी

(CM Uddhav Thackeray successfully handled coronavirus second wave in Maharashtra)