अखेर ग्रामसभांना परवानगी, कोरोना नियमांचं पालन करावं लागणार

| Updated on: Feb 11, 2021 | 6:09 PM

कोविड 19 च्या अनुषंगानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभांना आयोजन करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे.

अखेर ग्रामसभांना परवानगी, कोरोना नियमांचं पालन करावं लागणार
ग्रामसभा, प्रतिकात्मक फोटो
Follow us on

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक आणि संरपंच निवडीनंतर ग्रामसभा होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. कारण, कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारनं ग्रामसभांवर घातलेली बंदी उठवली आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन ग्रामसभांना आयोजन करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. तशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.(Permission to hold Gram Sabha by rural development ministry)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण मधल्या काळात कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती दिली होती. दरम्यान, ग्रामसभेच्या मंजुरीअभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, खेट संरपंच विरोधातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे, अशा अनेक बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत.

आता पूर्वीप्रमाणे ग्रामसभा होणार

या बाबी विचारात घेऊन कोविड 19 च्या अनुषंगानं निर्गमित मार्गदर्शनक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीला अधीन राहुन पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यात परवानगी देण्याची आल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली आहे. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4 ग्रामसभांचे आयोजन करणं बंधनकारक आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रासाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं वेळोवेळी आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अधिसूचनाही काढली आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभा आणि संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, सध्यस्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. जनजीवन पूर्ववत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक गुरुवारी जारी केल्याचंही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितलं.

31 मार्चपर्यंत ग्रामसभा न घेण्याचा झाला होता निर्णय

ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. कोरोना महामारींमुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र एका प्रशासकाकडे अनेक गावांचा कारभार देण्यात आला होता. आता एकच प्रशासक 4-5 ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायतींचा गुलाल उधळला, पण 31 मार्चपर्यंत ग्रामसभा नाही! कारण काय?

जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

Permission to hold Gram Sabha by rural development ministry