
नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण ते ओबीसी नाहीत, ते जनरल कोट्यातले होते, गुजरात सरकारने कायदा बदलला त्यानंतर ते ओबीसी झाले. पण महत्वाचा प्रश्न आहे की, नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले? जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची लूट सुरु आहे.

भाजप सरकार मात्र तुम्हाला म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, और भूके मर जावो’ असा प्रहार काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. जोरदार टीका करताना राहुल गांधी हे यावेळी दिसले. भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा मुक्काम भिवंडीत आणि उद्या १६ तारखेला मुंबईत ही यात्रा दाखल होईल.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पालघर जिल्ह्यातील वाडा येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानमध्ये 88 टक्के लोकसंख्या ओबीसी, दलित, आदिवासी, मागास समाजाची आहे परंतु विविध क्षेत्रातील त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे.

न्याय पालिकेतही वरच्या पदावर या समाज घटकातील लोकांची संख्या कमी आहे. सहा टक्के लोकांच्या हातात न्यायालय, मीडिया, पैसा, सत्ता आहे. जमीन अधिग्रहण करताना गरीब समाज घटकांची जमीन घेतली जाते पण अदानीची एक इंचही जमीन घेतली जात नाही. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही तर कंपन्यांना होत आहे. केंद्र सरकार 16 पिक विमा कंपन्यांना 35 हजार कोटी रुपये देते हा जनतेचा पैसा आहे.

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास दिवासींना जमीन पट्टे दिले जातील, जेथे 50 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे तेथे 6 वे शेड्युल लागू केले जाईल म्हणजे स्थानिक सरकार, गावाच्या हातातच सर्व अधिकार असतील. प्रशासन व विविध क्षेत्रातील ही विषमता दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची गरज आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.