मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारा रायगडचा शेतकरी ‘मातोश्री’बाहेर सहकुटुंब उपोषणाला

| Updated on: Oct 26, 2020 | 3:15 PM

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी महेंद्र देशमुख यांनी लहान मुलीसह 'मातोश्री'मध्ये घुसण्याचा प्रयत्न जानेवारीत महिन्यात केला होता

मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारा रायगडचा शेतकरी मातोश्रीबाहेर सहकुटुंब उपोषणाला
Follow us on

मुंबई : बँकेच्या कर्जामुळे ‘मातोश्री’वर घुसण्याचा प्रयत्न करणारा रायगडचा शेतकरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसला. महेंद्र देशमुख यांनी आपल्या लहान मुलीसोबतच पत्नीलाही घेऊन ‘मातोश्री’ गाठले, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (Raigad Farmer Protests outside CM Uddhav Thackeray’s residence Matoshree)

बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’मध्ये घुसण्याचा प्रयत्न जानेवारीत महिन्यात केला होता. पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी न्याय देण्याचे आश्वासन शेतकऱ्याला दिले होते. मात्र अद्याप न्याय न मिळाल्याचे सांगत आपली पत्नी आणि मुलीसह ते मातोश्रीबाहेर उपोषणाला आला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

फेब्रुवारीत अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी सांगितलं की यांचं प्रकरण तडिस न्या, पण आजपर्यंत कोणीही न्याय दिला नाही. जून महिन्यापासून मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे प्रयत्न सुरु केले, मात्र कोणीही भेट होऊ दिली नाही, असा आरोप महेंद्र देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केला.

कोण आहेत महेंद्र देशमुख?

पनवेल तालुक्यातील आपटा शाखेच्या बँक ऑफ इंडियाने फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आंदोलन केलं होतं. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी 6 जानेवारीला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कृषिमंत्री म्हणाले होते.

मातोश्रीवरील आंदोलनापासून चर्चेत असलेले महेंद्र देशमुख पनवेल तहसीलदार कार्यालयात पत्नी आणि तीन मुलींसह उपोषणाला आले होते. मात्र या चौघांना पोलिसांनी बसू दिलं नव्हतं. पनवेल तहसीलदार अमित सानप यांनी कर्ज न घेता शेतकऱ्यावर खोटं कर्ज दाखवलं. तसेच त्याच्या फिक्स डिपॉझिटची रक्कम त्याला परत मिळू नये यासाठी हे षड्यंत्र रचल्याचा आरोप शेतकरी महेंद्र देशमुख यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

महेंद्र देशमुख यांनी तीन मुलींच्या शिक्षणासाठी, तसेच स्वखर्चासाठी 23 फेब्रुवारी 2006 रोजी 8 लाख 40 हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती.

2008 मध्ये बँकेने देशमुख यांना दूध डेअरीच्या व्यवसायासाठी 40 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. त्यावेळी त्या 40 लाखांसाठी देशमुख यांची 40 लाख रुपये किंमतीएवढी मालमत्ता बँकेला तारण म्हणून हवी होती.

15 मार्च 2008 रोजी महेंद्र देशमुख यांनी 10 लाख 20 हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी 2006 आणि 2007 या वर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे 23 ते 24 लाखांपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास 8 लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे 32 लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली. मात्र तरीही 40 लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी 8 लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित राहिले.

या सर्व प्रकरणात तारण ठेवलेले जवळपास 32 लाख रुपये परत मिळू नयेत, यासाठी कर्ज काढण्याआधीच बँकेने तीन कर्ज लेखी पत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर महेंद्र देशमुख न्याय मागण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र देशमुख आणि त्यांच्या लहान मुलीला खेरवाडी पोलीस ठाण्यात सहा तास बसवले होते. यानंतर दोघांना कुर्ला रेल्वे पोलिसांकडून पनवेलकडे पाठवले होते.

संबंधित बातम्या :

‘मातोश्री’वर आलेला ‘तो’ शेतकरी मदतीसाठी कृषीमंत्र्यांकडे, 8 दिवसात चौकशी करा, कृषीमंत्र्यांचे आदेश

भाजपवरच भिस्त, ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करणारा शेतकरी फडणवीसांच्या भेटीला

(Raigad Farmer Protests outside CM Uddhav Thackeray’s residence Matoshree)