मुंबई, ठाणे, कल्याणसह परिसरात पावसाचा जोर, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

| Updated on: Sep 04, 2019 | 7:56 AM

मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबई पोलिसांनीही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई, ठाणे, कल्याणसह परिसरात पावसाचा जोर, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Follow us on

मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या परिसरात रात्रीपासून पावसाने जोर (Mumbai Rain) धरला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडीसह नालासोपारा, विरार परिसरात पाऊस सुरु आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक (Western Railway) उशिराने सुरु आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासह मुंबई आणि परिसरात वरुणराजाचंही पुनरागमन झालेलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र गणपती दर्शनासह दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जनही निर्विघ्न पार पडलं.

रात्रभर बरसलेल्या पावसामुळे मुंबईतील गांधी मार्केट, हिंदमाता, सायन सर्कल यासारख्या सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र सकाळच्या सुमारास साचलेलं पाणी ओसरायला लागलं.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागपूर, गोंदिया, मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं स्कायमेटने सांगितलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गणपती विसर्जनाच्या वेळी भरतीच्या वेळांबाबतही मुंबई पोलिसांनी सूचना दिलेली. या काळात भावनेच्या भरात बाप्पाला निरोप देताना आपली सुरक्षितता धोक्यात आणू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी सर्व गणेशभक्तांना केलं आहे.