बाळासाहेबांची 100 वी जयंती, राज ठाकरेंची काळजाला भिडणारी पोस्ट, मराठी माणसाला दिला मोठा शब्द

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सध्याच्या राजकारणातील विकल्या जाणाऱ्या निष्ठा आणि बाळासाहेबांचा वारसा यावर भाष्य करत मराठी माणसाला एक महत्त्वाचा शब्द दिला आहे.

बाळासाहेबांची 100 वी जयंती, राज ठाकरेंची काळजाला भिडणारी पोस्ट, मराठी माणसाला दिला मोठा शब्द
Raj Thackeray Balasaheb Thackeray post
| Updated on: Jan 23, 2026 | 9:57 AM

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज १०० वी जयंती. या निमित्ताने सध्या दादर येथील शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी पोस्ट शेअर केली आहे. बाळासाहेबांचा प्रभाव हा काळाच्या पलीकडचा असून ते केवळ आजच नाही तर त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब आणि स्वत:चा एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे हे बाळासाहेबांची शाल घेऊन हातात उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत. हा फोटो भाषणाच्या एका व्यासपीठावरील असल्याचे बोललं जात आहे. या फोटोला कॅप्शन देताना राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

राज ठाकरेंची पोस्ट

स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.

आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा.

बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे.

राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.

बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे ‘बाळासाहेब’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही. स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी बाळासाहेबांच्या तत्त्वांची आठवण करून दिली आहे. केवळ सत्तेसाठी नव्हे, तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आपला लढा सुरूच राहील, असा ठाम विश्वास त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे.