‘अरे गधड्या तुझी सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का?’, राज ठाकरे यांचा राहुल गांधी यांच्यावर घणाघात

| Updated on: Nov 27, 2022 | 9:39 PM

"राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की आर डी बर्मन बोलतात हेच कळत नाही (राहुल गांधी यांची नक्कल) काय बोलतोय ते ऐकून तर घेऊ दे", अशी टीका राज ठाकरेंनी केली.

अरे गधड्या तुझी सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का?, राज ठाकरे यांचा राहुल गांधी यांच्यावर घणाघात
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाषण करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर राज ठाकरे यांनी आज भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. “अरे गधड्या तुझी सावरकरांवर बोलायची लायकी तरी आहे का? सावरकर कोण होते ते माहिती तरी आहे का? त्यांना कुठे ठेवलं होतं ते काय करत होते? काय हालअपेष्ठा सहन केल्या?”, असे सवाल राज ठाकरेंनी केले.

“फक्त महापुरुषांची बदनामी करणं चाललंय. त्यादिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते ना, गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की आर डी बर्मन बोलतात हेच कळत नाही (राहुल गांधी यांची नक्कल) काय बोलतोय ते ऐकून तर घेऊ दे”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

“म्हणे सावरकरांनी माफी मागितली. दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी वापरली. अहो, सर सलामत तर पगडी पचास. पन्नास वर्षांची शिक्षा झालेला माणूस आतमध्ये सडत राहण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर पुन्हा हंगामा करतो हे डोक्यात सगळं चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात”, असं राज ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“आमची कृष्णनीती आम्हाला काय सांगतेय? एखादी चांगली गोष्टी घडणार असेल, ती घडण्यासाठी खोटं बोलावं लागत असेल तर खोटं बोला. पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे”, असं ठाकरे म्हणाले.

“आमच्या शिवरायांनी ज्यावेळी मिर्झाराजेंना गडकिल्ले दिले ती काय चितळेंची बर्फी होती का? गडकिल्ले म्हणजे घेऊन जा. त्यावेळची परिस्थिती तशी होती. मावळे थकलेले होते. आर्थिक अडचणी होत्या. भरपूर गोष्टी होत्या. आणि आलेल्या सैन्याला तोंड द्यायचं हे शक्य नव्हतं”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“काय करायचं होतं? गड किल्ले लिहून द्यायचे होते ना? चला लिहून देतो. घेऊन तर जाणार नाहीत ना? परिस्थिती निवळली तर परत घेऊ की हातात. गडकिल्ले तर तिथेच आहे. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ही स्ट्रॅटेजी ज्याला कळत नाही तो गुळगुळीत मेंदुचा”, अशी टीका त्यांनी केली.

“या गोष्टी देशात थांबायला हव्यात. जसं काँग्रेसला सांगणं आहे तसंच भाजपलाही सांगणं आहे. बस करा. ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्याचा लढा दिला त्यांची बदनामी करुन आता काय मिळणार आहे?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.