वेब सीरिजचे निर्माते बदल करण्यास तयार, पण त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय ‘तांडव’ थांबणार नाही : राम कदम

| Updated on: Jan 19, 2021 | 11:34 PM

वेब सीरिजच्या निर्मात्यांना जोपर्यंत जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत आमचं तांडव थांबणार नाही, असं भाजप आमदार राम कदम ट्विटरवर म्हणाले आहेत (Ram Kadam on Tandav web series)

वेब सीरिजचे निर्माते बदल करण्यास तयार, पण त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय तांडव थांबणार नाही : राम कदम
राम कदम, भाजप आमदार
Follow us on

मुंबई : अ‍ॅमेझोन प्राईमच्या ‘तांडव’ या वेब सीरिजवरुन सोशल मीडियावर तुफान राडा सुरु आहे. या वेब सीरिजचे निर्माते अली अब्बास जफर यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे. याशिवाय वेब सीरिजमध्ये वादग्रस्त ठरलेला भाग बदलण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, या वेब सीरिजच्या निर्मात्यांना जोपर्यंत जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत आमचं तांडव थांबणार नाही, असं भाजप आमदार राम कदम ट्विटरवर म्हणाले आहेत. त्यामुळे तांडव वेब सीरिजचा वाद तूर्तास निवळण्याची शक्यता कमी आहे (Ram Kadam on Tandav web series).

“तांडवच्या निर्मात्यांनी वेब सीरिजमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय आमचं तांडव थांबणार नाही. जवळपास चार दिवस होत आले, मात्र महाराष्ट्र सरकारने या विरोधात एफआरआयही दाखल केलेला नाही. देवतांना अपमानित करणाऱ्यांना वाचवले जात आहे. आमचा संघर्ष सुरुच राहील”, असं राम कदम म्हणाले (Ram Kadam on Tandav web series).

वेब सीरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान राम यांचा अपमान झाल्याचा दर्शकांचा आरोप आहे. ‘तांडव’ वेब सीरीजमध्ये ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी त्वरित अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या अधिकाऱ्यांना बोलावले. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी ‘तांडव’विरोधात आंदोलन करून, वेब सीरीजवर त्वरित बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

‘तांडव’विरोधात FIR

अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव वेब सिरीज विरोधात अनेक तक्रारी दाखल होत आहेत. सोमवारी अली अब्बास जफरने एक निवेदन काढून हिंदू संघटनांची माफी मागितली आहे. तरीही तांडवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण, आता गौतम बुद्ध नगरातील रबुपुरा पोलिस स्टेशनमध्ये निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

निर्मात्याच्या माफीनामा

ही वेब सीरीज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरीजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : अवघ्या विश्वाला हादरवणाऱ्या ‘तांडव’चं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या महादेवाच्या या निर्मितीबद्दल…