कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’; मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’

| Updated on: Jul 11, 2021 | 11:04 PM

बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. (Red Alert for Konkan, Central Maharashtra for next five days; Four days 'Orange Alert' in Mumbai)

कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’; मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’
कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’; मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’
Follow us on

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत आज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केला आहे. (Red Alert for Konkan, Central Maharashtra for next five days; Four days ‘Orange Alert’ in Mumbai)

बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास 20 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी, विभागांसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

कोकणात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र पुढच्या दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवून हवामान खात्याने संपूर्ण कोकण परिसरासाठी ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, राजापूर, लांजा परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अधूनमधून विश्रांती घेऊन पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सकाळपासून विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.

गुहागर-चिपळूण मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

गुहागर- चिपळूण मार्गावरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे रविवारी या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घोणसरे येथील गायकरवाडी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करताना केलेला भराव व्यवस्थितपणे न टाकल्याने पुलावरून पाणी जात आहे. रविवारी पाऊस सतत सुरु राहिल्यामुळे पुलावरून पाणी गेले. परिणामी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे, गुहागर – विजापूर या रस्त्यावरील वाहतूकही जवळपास दोन तास ठप्प झाली होती. पाणी कमी झाल्यानंतर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

अलिबाग- मुरुड रस्त्यावरील पूल कोसळला

रायगड जिल्ह्यात सर्वत्र आज तुरळक पाऊस झाला. मात्र या पावसाच्या संततधारेमुळे अलिबाग- मुरुड रस्त्यावरील आर्च पद्धतीने बाधंकाम करण्यात आलेला पुल कोसळला. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. प्रशासनाने या मार्गावरील वाहनांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचा सूचना केल्या. तसेच जिल्ह्यातील कुडंलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी, उल्हास या नद्यांच्या पाण्याची पातळी सध्यातरी ‘इशारा पातळी’पेक्षा कमी आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी आहे. मात्र पावसाचा जोर वाढण्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा सूचना करण्यात आल्या आहेत. (Red Alert for Konkan, Central Maharashtra for next five days; Four days ‘Orange Alert’ in Mumbai)

इतर बातम्या

Realme चा पहिला टॅब्लेट लाँचिंगसाठी सज्ज, आकर्षक डिझाईनसह जबरदस्त फीचर्स मिळणार

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीत वेगाने सुधार, हलका, मऊ आहार देण्याचा डॉक्टरांचा सल्ला