‘हे’ म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं : रोहित पवार

| Updated on: Dec 21, 2020 | 9:18 PM

केंद्रीय पथकाने अतिवृष्टीची आत्ता पाहणी करणं म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं असला प्रकार आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

हे म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं : रोहित पवार
Follow us on

मुंबई : अतिवृष्टीनं नुकसान होऊन अनेक दिवस उलटले. मात्र तेव्हा केंद्र सरकारचं कोणतंही पथक पाहणीला आलं नाही. केंद्र सरकारला उशिरा शहाणपण आलं आणि मग आता राज्यात केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका केलीय. केंद्रीय पथकाने अतिवृष्टीची आत्ता पाहणी करणं म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं असला प्रकार आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये, अशीही मागणी केली (Rohit Pawar criticize Central Government team for crop damage inspection).

रोहित पवार यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच आता पथक नको, थेट मदत पाठवा, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, “राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 2 महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये. आता पथक नको मदत पाठवा.”

केंद्रीय पथकाच्या या पाहणीवर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, “शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने केंद्राकडे वारंवार मदत करावी अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं. आता शास्त्रीय पद्धतीने पाहणी करावी म्हणजे नुकसान दिसेल. मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे.”

दुसरीकडे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केंद्रीय पथक उशीरा आल्यानंतर मोदी सरकारची बाजू घेत सारवासारव केलीय. ते म्हणाले, “राज्य सरकारने उशिराने नुकसानीची माहिती आणि मेमोरेंडम पाठविल्याने केंद्रीय पथक पाहणीसाठी उशिराने आले. राज्य सरकारने उशीर केल्याने केंद्राची मदत मिळायला उशीर झाला. केंद्रीय पथक उशिराने आलं असलं तरी केंद्र सरकारकडून नक्की मदत मिळेल.”

‘पथकं येतात, आमचा वेळ खाऊन जातात, पण मदत भेटत नाही’

तब्बल 2 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज (21 डिसेंबर) उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले. यावेळी शेतकऱ्यांनी या पथकासमोर समस्यांचा पाढा वाचला. अनेक शेतकऱ्यांनी या पाहणी दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली. नेते, पथके येतात जातात, आमचा वेळ खाऊन जातात. मात्र, मदत भेटत नाही, अशा शब्दांमध्ये शेतकऱ्यांनी या पाहणी पथकावर नाराजी व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे, तर काहींची शेती वाहून गेली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव पाटोदामधील गावांना केंद्रीय पथकाने भेटी दिल्या. सरकारने दिलेली मदत तुटपुंजी असून मदतीच्या नियमात आणि निकषात बदल होणे गरजेचे आहे. सरकारने तात्काळ मदत करावी, अशी मागणी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केंद्रीय पथकाला निवेदन देऊन केली आहे. केंद्रीय पथकाने उस्मानाबादमधील केशेगाव शिवारातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पथकासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देत आत्महत्या करू नका असं आवाहन केलं.

दरम्यान, केंद्रीय पथक मंगळवारी अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पुण्यात येणार आहे. यावेळी दौंड, इंदापूर, बारामतीमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी होणार आहे.

हेही वाचा :

जनतेला अहंकार आणि भाषण नको, काम हवं, रोहित पवारांचा भाजपवर हल्ला

रोहित पवारांची संकल्पना, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेकडून पोलिसांना चारचाकी आणि दुचाकी वाहने!

महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान; रोहित पवारांची स्तुतिसुमनं

Rohit Pawar criticize Central Government team for crop damage inspection