पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण…, पहलगाम हल्ल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे.

पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण..., पहलगाम हल्ल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Apr 24, 2025 | 2:51 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे, तसेच या घटनेत दोन विदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानात घुसायचं तर घुसा, मात्र दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?  

पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण या दहशतवाद्यांचा विषय कायम स्वरुपी संपवा, मला असं वाटतं की काही लोक धार्मिक विषय पुढे घेऊन चाललेले आहेत, मात्र मदत करणारे पण मुस्लिम होते. त्यामुळे यामध्ये धार्मिक मुद्दे घेऊ नये, दहशतवाद्यांना जात नसते, दहशतवाद्यांना धर्म नसतो, कुठलंही सरकार असो त्यांनी जर दहशतवाद्यांविरोधात निर्णय घेतला तर अख्खा देश त्यांच्या पाठीशी भक्कामपणे उभा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला, आहे. या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा मिळणार नाहीये, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे, तसेच भारतामध्ये असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांमध्ये देश सोडावा असे आदेश देखील देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयाचा पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे.

दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्याच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती होती. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं आता मोठी कारवाई केली आहे, जम्मू -काश्मीरमधील तब्बल दीड हजार लोक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.