परमवीर सिंहांना वाचवण्यासाठी भाजपची कव्हरिंग फायर; एनआयए गायब DVR ची चौकशी का करत नाही?

| Updated on: Mar 27, 2021 | 3:46 PM

दोनच तासामध्ये हा डीव्हीआर एटीएसला देऊन चूक झाली असे लक्षात आल्याने परमवीर सिंह यांनी तो परत मागवून घेतला. | NIA sachin vaze

परमवीर सिंहांना वाचवण्यासाठी भाजपची कव्हरिंग फायर; एनआयए गायब DVR ची चौकशी का करत नाही?
एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना परवमवीरसिंह यांच्या कार्यालयातून फोन गेला
Follow us on

मुंबई: परमवीर सिंह पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयातून मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा DVR गायब झाला असून एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या 18 दिवसापासून एनआयएने सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा जबाब घेतला नाही, हे आश्चर्याचे आहे. सदर डीव्हीआर गायब करण्यामागे परमवीर सिंह (Parambir Singh) यांचा हात आहे का, याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल तर राज्य सरकारने ती चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली. (Congress leader Sachin Sawant on NIA and Parambir singh matter)

ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 10 मार्च 2021 रोजी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसराचा डीव्हीआर एटीएसने अधिकृतरित्या ताब्यात घेतला. परंतु दोनच तासामध्ये हा डीव्हीआर एटीएसला देऊन चूक झाली असे लक्षात आल्याने एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना परवमवीर सिंह यांच्या कार्यालयातून फोन गेला, हा फोन कोणी केला हे स्पष्ट आहे व चौकशीअंती समोर येईल. परंतु सदर डीव्हीआरमध्ये स्पष्ट दिसत नाही असे कारण देऊन तो DVR नंतर तपासून परत देऊ, असे म्हणत डीव्हीआर परत मागवण्यात आला.

परमवीरसिंह यांच्या कार्यालयामधून अधिकृतपणे अधिकाऱ्याला पाठवून तो ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर सदर डीव्हीआर गायब झाला आहे. एनआयए याची चौकशी का करत नाही. हा सवाल सावंत यांनी विचारला आहे. सदर डीव्हीआर मध्ये स्कॉर्पिओ, इनोव्हा गाड्यांची मुव्हमेंट, सचिन वाजे व इतर जण कोणाच्या संपर्कात होते हे स्पष्ट दिसत होते, असे सावंत यांनी म्हटले.

‘देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी’

भाजपने परवमीरसिंह यांच्या चौकशीची मागणी करणे थांबवले आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या याकडून दुसरीकडे लक्ष जावे हा भाजपाचा प्रयत्न असल्यानेच मुख्य मुद्दा बाजूला सारून संबंध नसलेल्या इतर प्रकरणावर बेफाम आरोप केले गेले. सातत्याने गोलपोस्ट बदलले गेले. रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे केलेल्या फोन टॅपिंगचा अहवाल समोर आणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले होते त्याची हवा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सत्यदर्शक अहवालाने काढून टाकली.

आता 6.3 जीबीचा पेन ड्राईव्ह जर रश्मी शुक्ला यांनीच सरकारला दिला नाही तर फडणवीस यांनी हा पेन ड्राईव्ह कोठून मिळवला. केंद्रीय गृहसचिवांना खोटी माहिती देऊन महाराष्ट्राला बदनाम केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.

‘भाजपकडून लक्ष विचलित करून परमवीर सिंहांना वाचवण्याचा प्रयत्न’

परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिले व त्यामध्ये गृहमंत्र्यांवर आरोप केले त्यात कोणताही सबळ पुरावा दिला नाही. दोन व्यक्तींच्या संभाषणातील पुरावा हा रेकॉर्डिंगच असावा लागतो. पण परमवीरसिंह यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांकडून कथीत ऐकीव माहितीच्या आधारे पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत न्यायीक चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईलच.परमवीरसिंह आणि फडणवीस यांनी सचिन वाझेंनी फेब्रुवारी अखेरीस गृहमंत्र्याची भेट घेतली असा आरोप केला आहे. प्रश्न फेब्रुवारी अखेरच्या भेटीचा महत्वाचा नसून अँटिलिया येथे घटना घडली त्या अगोदर सचिन वाझे कोणाच्या संपर्कात होते हे महत्वाचे आहे. त्यापासून भाजपा जाणीवपूर्वक जनतेचे लक्ष दुसरीकडे नेत आहेत, असे सावंत म्हणाले.
परमविरसिंह यांच्या पत्रामध्येच गृहमंत्र्यांची तक्रार एपीआय वाझे यांनी पोलीस आयुक्त असलेल्या परमविरसिंह यांना केली असे म्हटले आहे, याचाच अर्थ वाझे हा परमवीरसिंह यांच्या अतिशय जवळ होता तसेच वाझे परमवीरसिंह यांना एकापेक्षा अधिकवेळा भेटला असेही पत्रात नमूद आहे.

सचिन वाझेचे कार्यालय मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या दोनशे फुटावरच आहे. तसेच एपीआय दर्जाचा सचिन वाझे हा पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलिस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त व पोलीस सहआयुक्त यांना बाजूला सारून थेट आयुक्तांना रिपोर्ट करत होता. इतका संबंध असताना याबाबत एनआयएने 18 दिवसात तपास करु नये हे आश्चर्याचे आहे.

आता एनआयएने (UAPA) युएपीए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे पण कोणाच्या मार्गदर्शनावर हे षडयंत्र केले हे अजूनही तपासले नाही, हे आश्चर्याचे आहे. म्हणूनच या प्रकरणाचा एनआयएने तत्काळ तपास करावा. एटीएसकडून जबरदस्तीने तपास काढून घेतला हे पारदर्शकतेच्या तत्वाला धरून नाही. भाजपा केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून काम करते हे सुशांतसिंह प्रकरणात 9 महिने गप्प बसलेल्या सीबीआयवरून स्पष्ट होते. परंतु या प्रकरणात कोणीही एनआयएला रोखले नसताना तपास पुढे का केला जात नाही, याचे उत्तर एनआयएला द्यावे लागेल, असेही सावंत म्हणाले.

संबंधित बातम्या:

सचिन वाझे कुणाच्या जवळचे? परमबीर सिंगांची चौकशी का होत नाही?; काँग्रेसचा एनआयएला सवाल

(Congress leader Sachin Sawant on NIA and Parambir singh matter)