सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक : सदाभाऊ खोत

| Updated on: Jan 18, 2020 | 8:42 AM

विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. याच गोष्टीचा धागा पकडत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली.

सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक : सदाभाऊ खोत
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे”, असा घणाघात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. याच गोष्टीचा धागा पकडत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीवर टीका केली.

“एखाद्या राजकीय पक्षानं शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करु, असं जाहीरनाम्यामध्ये म्हटलं असेल तर त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे. कारण त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख करायला हवा होता की, तुमच्या पीककर्जालाच माफी देऊ, तुम्ही शेतीच्या जोडधंद्याला जे कर्ज घ्याल त्याला आम्ही माफी देणार नाही, असं जर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं असतं तर लोकांनीदेखील ठरवलं असतं की कुणाच्या बाजूने जायचं ते”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

“निवडणूक आयोगाने याची दक्षता घ्यावी. आम्ही ही मागणी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. जे पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये छापतात आणि निवडून आल्यानंतर त्याची जर ते अंमलबजावणी करणार नसतील तर अशा पक्षांची नोंदणी रद्द केली गेली पाहिजे, कारण यांनी जनतेची फसवणूक केली आहे”, असंदेखील सदाभाऊ खोत म्हणाले.

“जे पक्ष निवडणुकीपूर्वी जाहीरनामे प्रसिद्ध करतात. त्या जाहीरनाम्यांना संमती द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असायला हवेत. निवडणूक आयोगाने खरंतर तसं धोरणच सुरु करायला हवं. निवडणुकीच्यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करायचा, त्या जाहीरनाम्यात काहीही आश्वासनं देऊन आपल्या उमेदवारांना निवडून आणायचं, या गोष्टीचा राजकारणावरही विपरीत परिणाम होतो” असं सदाभाऊ खोत म्हणाले.