आरक्षणासाठी लोकांना चिथावणी देऊन भाजपला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा का? : डॉ. संजय लाखे पाटील

| Updated on: May 27, 2021 | 8:51 PM

स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजी राजेंवर दबाव टाकण्याचे पाप करू नये, असा इशारा काँग्रेस प्रवक्ते संजय लाखे यांनी दिलाय.

आरक्षणासाठी लोकांना चिथावणी देऊन भाजपला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा का? : डॉ. संजय लाखे पाटील
Follow us on

मुंबई : “पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून कोट्यावधी लोकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गलथानपणामुळेच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. महाराष्ट्रातील 21 पेक्षा जास्त जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त असताना मराठा आरक्षणासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा. अन्यथा वेळ जाईल असे म्हणून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केला. तसेच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजी राजेंवर दबाव टाकण्याचे पाप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला (Congress spokesperson Sanjay Lakhe Patil criticize Chandrakant Patil and BJP over Maratha reservation).

“भाजपच्या तत्कालीन फडणवीस आणि मोदी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती”

डॉ. संजय लाखे म्हणाले, “भाजपच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. याचा राजकीय फटका आपल्याला बसू नये म्हणून वारंवार खोटे बोलून आपल्या पापाची जबाबदारी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील नेते करत आहेत. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त असल्याचे राज्याच्या मंत्रीमंडळासमोर ठेवलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे . तरीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी विनायक मेटेंसारख्या बुजगावण्यांना पुढे केलं जातंय.”

“आंदोलनाच्या नावाखाली लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा भाजपचा कुटील डाव”

“मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा कुटील डाव भाजपने रचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकार, पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीच देऊ शकतात. भाजपला आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. पण भाजपला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तर मराठा समाजाचा वापर करून राज्य सरकारला बदनाम करण्याचा व आपला राजकीय स्वार्थ गाठायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिचे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण त्यासाठी चंद्रकांत पाटलांनी दाखवलेला मार्ग राज्याला उत्तर प्रदेशातील गंगाघाटाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे,” असं संजय लाखे यांनी सांगितलं.

“राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये”

संजय लाखे म्हणाले, “मराठा आरक्षणप्रकरणी भाजपचा दुतोंडी चेहरा उघड झालाय. त्यामुळे राज्यातील जनतेचा आता भाजप नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. जनतेसमोर तोंड दाखवायला जागा उरली नसल्याने चंद्रकांत पाटील छत्रपती संभाजीराजेंवर आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजी राजेंना भाजपने खासदार केल्याचं सांगत आहेत.”

“राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, मराठा समाज खपवून घेणार नाही”

“काँग्रेस सरकारने लता मंगेशकरांसारख्या अनेक महान कलाकारांना भारतरत्न दिला. सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला भारतरत्न देऊन राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर घेतले. विविध क्षेत्रातील अनेक कर्तृत्वान व्यक्तींना राज्यसभेवर घेतले, पण कधीही राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर केला नाही. परंतु सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या चंद्रकांत पाटलांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. मराठा समाज हे कदापी खपवून घेणार नाही. चंद्रकांत पाटलांनी खोटे बोलून मराठा समाजातील तरूणांची माथी भडकवण्याचा संघी उद्योग बंद केला नाही, तर मराठा समाज त्यांना योग्य धडा शिकवेल,” असा इशाराही डॉ. लाखे यांनी दिला.

हेही वाचा :

भाजपनेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? : सचिन सावंत

‘पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते मदत करत नसतील तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’

शाहू महाराज आणि प्रबोधनकार मित्र होते, राज आणि माझाही कॉमन पाईंट : संभाजीराजे छत्रपती

व्हिडीओ पाहा :

Congress spokesperson Sanjay Lakhe Patil criticize Chandrakant Patil and BJP over Maratha reservation