संजय राऊत यांचा निवडणूक आयोगावर मोठ्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाले, हा तर शतकातील सर्वात मोठा…

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर "शतकातील सर्वात मोठा घोटाळा" केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दबाव आणि आर्थिक प्रलोभनांमुळे शिवसेना पक्षचिन्ह फुटीर गटाला दिल्याचा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोगावर अमित शहांच्या घरगड्यासारखे काम करत असल्याचा आरोप करत, राऊतांनी लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळण्याची आशा आहे.

संजय राऊत यांचा निवडणूक आयोगावर मोठ्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाले, हा तर शतकातील सर्वात मोठा...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 10:31 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह फुटीर गटाला देणं हा या शतकातील सर्वात मोठा घोटाळा आहे. दबावाखाली आणि आर्थिक प्रलोभनाखाली आमचा पक्ष फुटीर गटाला दिला गेला, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूक आयोगाचा हा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. कोर्टाच्याही लक्षात आलं आहे. सहा वर्षापूर्वी देशात, कोर्टात आणि निवडणूक आयोगात काय घडलं, हे लोकांना माहीत आहे. आता आकाश मोकळं होताना दिसत आहे. लोक मोकळा श्वास घेत आहेत. भविष्यात सर्व गोष्टी समोर येतील, असंही संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक आयोग गेल्या 10 ते 12 वर्षापासून अमित शाहांचा घरगडी म्हणून काम करत आहे. त्या दबावाखाली बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक आयोगाने फुटीर गटाला दिली. आम्ही सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडूनही न्याय मिळाला नाही. मूळ राजकीय पक्षाचं अस्तित्त्व महत्त्वाचं आहे, असं कालच सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस बागची यांनी काल म्हटलंय. हाच 10व्या शेड्यूलचा आत्मा आहे. मूळ राजकीय पक्ष काय आहे. कोण फुटलं? कसं फुटलं? हा नंतरचा प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दिवे लावून लोकशाही वाचणार नाही

निवडणूक चिन्ह… धनुष्यबाण गोठवणं आणि ते फुटीर गटाला देणं हा शेकडो कोटींचा घोटाळा आहे. आताचे निवडणूक आयुक्त आणि त्या आधीचे निवडणूक आयुक्त हे शाहांच्या घरगड्यांसारखेच वागले आणि वागतील. बाळासाहेबांचं चिन्ह का घेतलं? वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवायला हवी होती, असं काल न्यायामूर्ती म्हणाले. तेच ममता बॅनर्जींबाबत व्हायला हवं होतं. शरद पवारांचा पक्ष अस्तित्वात आहे. पवार अस्तित्त्वात आहेत. तरीही चिन्ह दुसऱ्यांना दिलं जातं. निवडणूक आयोग अन्याय पद्धतीने बेफाम निर्णय देत असेल तर देशातील लोकशाही धोक्यात आहे. मोदींच्या वाढदिवसाला दिवे लावून लोकशाही वाचणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

ज्याच्या घरात चोरी…

सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू उत्तम मांडली. आम्ही 10 व्या शेड्यूलची व्याख्या केली आहे. 10 शेड्यूल बाबत निवडणूक आयोग आणि तेव्हाच्या सुप्रीम कोर्टाने चुकीची भूमिका घेऊन फुटीर गटाला मान्यता दिली. त्यावर आमची लढाई सुरू आहे. तुम्ही आम्हाला चोर ठरवलं. ज्याच्या घरात चोरी झाली त्याला चोर ठरवलं. चोर चोरी करून गेले. हा कोणता न्याय आहे? पाच वर्ष आम्ही अन्याय सहन केला. यावेळी न्याय होईल असं वाटतं. आम्ही आशावादी आहोत, असंही ते म्हणाले.

चिन्हावर बंदी नको

यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षावरही प्रतिक्रिया दिली. टीएमसी हा मूळ पक्ष ममता बॅनर्जींचा आहे. पक्षाची स्थापना ममता बॅनर्जी यांनी केली. पक्षाची ध्येयधोरणं त्यांनी ठरवली. आमदार आणि खासदारांना ममता बॅनर्जी यांनीच एबी फॉर्म दिला. पण अमित शाहांनी त्यांचा पक्ष फोडला. 22 खासदार बाजूला गेले म्हणजे पक्ष दुसऱ्यांचा होईल का? टीएमसीच्या चिन्हावर बंदी येऊ नये. बंडखोरांनी दुसरं चिन्ह लढवावं ना? असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us