
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं सांगितलं आहे. शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र करण्यात आलं आहे. या निर्णयावरून संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांसह भाजपवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली आहे.
शिवसेना कधीच संपणार नाही, आजचा निर्णय हा काही न्याय नाही. भाजपचं हे मोठं षडयंत्र आहे. अकरा कोटी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम मराठी माणूस राहुल नार्वेकर यांनी केलंय. ही एक मॅच फिक्सिंग आहे मी सकाळपासून बोलत होतो. श्री रामांचं नाव घेण्याचं नार्वेकर यांना अधिकार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिंदे, नार्वेकर कोण? काय त्यांची औकात काय आहे? मराठी माणसासाठी आणि लोकशाहीमधील ही काळा दिवस आहे. इतिहास माफ करणार नाही हे शिंदेंना जावून सांग. कितीही खोके आणा, शिवसेना संपणार नाही. आजचं निकालपत्र हे दिल्लीतून टाईप करून आलं आहे. सुप्रीम कोर्ट शहाणं की आता बसलेले दीड शहाणे? विधानसभा अध्यक्ष खोटारडे पणाने वागले असून बेकायदेशीर अध्यक्षांनी बेकायदेशीर निर्णय घेतला असल्याचं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेना कोणी स्थापन केली हे सर्वांना माहित आहे. विधीमंडळ पक्षाला कोणताही अधिकार नाही. व्हीपची निवड ही ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. बाळासाबहेबांनी ह्यात असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचा पदभार सोपवला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांची भक्कम होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिली आहे.