संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना थेट मुलाची जागा वाचवण्याचं आव्हान; काय म्हणाले राऊत?

भाजपने मुलायम सिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा केला होता. त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं भाजप म्हणत होती. त्यांनात आता भाजपने पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे.

संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना थेट मुलाची जागा वाचवण्याचं आव्हान; काय म्हणाले राऊत?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 28, 2023 | 10:53 AM

मुंबई: सी-व्होटरचा सर्व्हे आला आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा सर्व्हे फेटाळून लावला आहे. महाविकास आघाडीच्या चार-पाच जागा निवडून आल्या तरी पुरे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीची खिल्ली उडवली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या सर्व्हेवरून शिंदे यांना जशासतसे उत्तर दिलं आहे. तुम्ही तुमच्या मुलाचा जागा वाचवली तरी पुरे, असं आव्हानच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात तेव्हा त्यांना हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्व्हे भाजपच्या बाजूने आहे, तो त्यांना हवाय. पण महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्या विरोधातील आहे. तो त्यांना नकोय. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला साधारण 34 जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा 40 ते 45 असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, 4-5 जागा मिळवल्या तरी पुरे. माझं म्हणणं आहे. त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा वाचवली तरी पुरे, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

पवार म्हणतात ते खरं आहे

वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत जाण्याबाबतचा प्रस्ताव आला नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांचं म्हणणं खरं आहे. अजूनही महाविकास आघाडी म्हणून वंचित बरोबर युती झाली नाही. चर्चा फक्त वंचित आणि शिवसेनेसोबतच झाली आहे, असं ते म्हणाले.

पुरस्काराला आक्षेप नाही

समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्यावरूनही संजय राऊत यांनी केंद्रावर टीका केली. मुलायमसिंह यादव यांना पुरस्कार दिला याविषयी आक्षेप नाही.

मुलायमसिंह यादव यांची राम मंदिरांबाबतची भूमिका, कारसेवकांवर त्यांनी केलेला गोळीबार यावर आक्षेप आहे. त्याला विरोध आहे. बाकी मुलायमसिंह यादव मोठे नेते होते. ते भूमिपूत्रांचे नेते होते. त्यांनी मोठं काम केलं आहे, असं ते म्हणाले.

तुमच्या विचारात बदल होतोय

भाजपने मुलायम सिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा केला होता. त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं भाजप म्हणत होती. त्यांनात आता भाजपने पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. तुमच्या विचारात हळूहळू बदल होत आहे, हे मी निदर्शनास आणून दिलं, असा चिमटा त्यांनी काढला.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राटांचा पुरस्कारासाठी विचार का केला नाही? भाजपने बाबरी पडल्यावर हातवर केले. तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं, ते हिंदू असतील तर मला अभिमान आहे.

मशीद पडली तेव्हा बाळासाहेबांनी कडवट भूमिका घेतली. त्यामुळे वातावरण तापलं होतं. त्यांनाच तुम्ही विसरला. राजकीय दृष्टीकोण ठेवून तुम्ही मुलायमसिंह यादव यांचा गौरव करता तर मग सावरकरांचा का नाही? असा सवाल त्यांनी केला.

पिपाण्या वाजवून चालणार नाही

मुलायमसिंह यादव यांच्या पक्षाने पुरस्काराची मागणी केली नव्हती. त्यांच्या कुटुंबीयांनीही मागणी केली नव्हती. तरीही तुम्ही पुरस्कार दिला. पण तुम्हाला ठाकरे, सावरकरांचा विसर पडला. केवळ पिपाण्या वाजवून चालणार नाही.राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरेंचा विचार करताय का ते पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

Follow Us