भाजप मेहबूबा मुफ्तींना अयोध्येला घेऊन जाणार होते का? संजय राऊतांचा सवाल

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा अयोध्याला जाणं आणि रामलल्लाचं दर्शन घेणं हे आमचं आश्वासन होतं. याच आश्वासनाची पूर्तता करण्याची तयारी सुरु आहे. आता यात राजकारण आणण्याची आमची मनस्थिती नाही. हा आमचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे", असं संजय राऊत म्हणाले.

भाजप मेहबूबा मुफ्तींना अयोध्येला घेऊन जाणार होते का? संजय राऊतांचा सवाल
| Updated on: Jan 25, 2020 | 11:37 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती देण्यासाठी संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती (Sanjay Raut annonced date of CM Uddhav Thackeray Ayodhya tour). राहुल गांधींनाही अयोध्याला घेऊन जाणार का? असा सवाल भाजपकडून शिवसेनेला विचारला जात आहे. पत्रकार परिषदेत याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता भाजप जम्मू-काश्मीरच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना अयोध्यात घेऊन जाणार होते का? असा उलट सवाल त्यांनी भाजपला केला.

“सर्वोच्च न्यायालयाचा राम मंदिराचा निकाल लागला तेव्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी या सर्वांनी निर्णयाचं स्वागत केलं होतं. पवार साहेबांनी देखील या निर्णयाचे स्वागत केलं होतं. भाजपच्या नजरेतून या गोष्टी सुटलेल्या दिसत आहेत. अयोध्येत राम मंदिर उभं राहावं अशाप्रकारची भूमिका त्यावेळच्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही घेतल्याचे माझ्या वाचण्यात आणि ऐकण्यात आले आहे. या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी माहिती घ्यावी, मग आम्हाला सल्ले द्यावे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा अयोध्याला जाणं आणि रामलल्लाचं दर्शन घेणं हे आमचं आश्वासन होतं. याच आश्वासनाची पूर्तता करण्याची तयारी सुरु आहे. आता यात राजकारण आणण्याची आमची मनस्थिती नाही. हा आमचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे”, असं संजय राऊत (Sanjay Raut annonced date of CM Uddhav Thackeray Ayodhya tour) म्हणाले.

“शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार याबाबत घोषणा झाली होती. पण नक्की केव्हा जाणार? हाच प्रश्न होता. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर जातील, अशी माहिती मी तुम्हाला दिली होती. पण आता 7 मार्चला मुख्यमंत्री अयोध्येला जातील, रामलल्लांचं दर्शन घेतील, शरयू आरतीचाही कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे आणि यात राजकारण होऊ नये आणि राजकीयदृष्टीने पाहू नये, अशी आमची अपेक्षा आहे”, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.