राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर जॉनी लिव्हरची पाहू; संजय राऊत यांचा राज यांना टोला

| Updated on: Nov 28, 2022 | 11:34 AM

जे आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला हवं होतं. अख्खा बुलढाणा त्या दिवशी रस्त्यावर उतरला होता.

राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर जॉनी लिव्हरची पाहू; संजय राऊत यांचा राज यांना टोला
राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर जॉनी लिव्हरची पाहू; संजय राऊत यांचा राज यांना टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. तीही ओरिजनल. आम्हाला मुद्रा अभिनय, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरचा पाहू. आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा. इतर अनेक आहेत. आम्ही खरी मिमिक्री पाहू, असा टोला ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. ते मीडियाशी बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्रीही केली होती. राज यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी अत्यंत खोचक शब्दात समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

हे आवाज काढणं, अमूक करणं, तमूक करणं हे खूप झालं. यापलिकडे आपण आता मॅच्युअर्ड झाला आहात. थोडं पलिकडे पाहा. महाराष्ट्र पाहा पूर्ण, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला.

उद्धव ठाकरेंवर टीका करून किंवा अन्य कुणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार? कुणाचंही. मी एका पक्षाचं नाव घेत नाही. काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. जे आम्ही करत आहोत. आमच्या पक्षावर एवढी संकटं आहेत. तरीही आम्ही काम करत आहोत, लढत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

जे आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला हवं होतं. अख्खा बुलढाणा त्या दिवशी रस्त्यावर उतरला होता. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हे महाराष्ट्राने पाहिलंय, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने गेल्या तीन महिन्यात ज्या पद्धतीने मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन दाखवावेत, असं आव्हानच त्यांनी राज ठाकरे यांना दिलं.