खालापूर दुर्घटनाग्रस्तांना मोफत शिवभोजन थाळी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, पीठ, साखर देणार; छगन भुजबळ यांची घोषणा

इर्शाळवाडी येथे बचावकाय वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जे लोक ढिगाऱ्याखालून काढले जात आहेत, त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.

खालापूर दुर्घटनाग्रस्तांना मोफत शिवभोजन थाळी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, पीठ, साखर देणार; छगन भुजबळ यांची घोषणा
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 20, 2023 | 11:42 AM

मुंबई | 20 जुलै 2023  : खालापूर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांना दरडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने खालापूरमधील इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सर्व काही दरड आणि पावसात वाहून गेलं आहे. किडूकडूकमिडूकही जवळ उरलं नसल्याने येथील गावकरी हतबल आणि हताश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत दुर्घटनाग्रस्तांना शिधा पुरवला जाईल, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील मोफत देण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.

97 लोकांची ओळख पटली

इर्शाळवाडी येथे बचावकाय वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जे लोक ढिगाऱ्याखालून काढले जात आहेत, त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत. आतापर्यंत 97 लोकांची ओळख पटली आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार आहे. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण घेता येत नाहीये, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मदतकार्य व्यवस्थित होत नाहीये

दरम्यान, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडतोय कुठे रडते कुठे ऑरेंज कलर दिलाय इर्शाळवाडी येथे झालेली घटना अत्यंत वेदनादायक आणि चटका लावून जाणारी आहे. या दुर्घटनेत पाच ते सात जणांचा तिथे मृत्यू झालाय. बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मदत कार्य त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाहीये त्यामुळे त्या सगळ्यांची चिंता आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

महापालिकेने खबरदारी घ्यावी

या प्रकाराची वलनर्याबिलिटी पाहून ऑडिट होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत, जिथे लोक राहतात त्या सगळ्यांचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचे आहे. ते होत नाहीये आणि हे सरकारचं सगळ्यात मोठा अपयश आहे, असा आरोप त्यांनी केला. इर्शाळगड येथे झालेल्या घटनेनंतर आमची तर मागणी आहे की, मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी लोक डोंगरावर राहतात. त्या ठिकाणी पण सकल भाग आहे. पाऊस जोरात पडला तर तिकडेही अशाच पद्धतीने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.