खोके, अवकाळी पाऊस, शेतकरी… दैनिक ‘सामना’तून फडणवीस यांच्या अर्थसंकल्पाची चिरफाड आणि हल्लाबोल

| Updated on: Mar 10, 2023 | 7:23 AM

विविध जातींसाठी महामंडळे, रस्ते, रेल्वे आणि विमानतळासाठी निधीची घोषणा... अशा एक ना अनेक घोषणांचा भडिमार फडणवीस यांनी केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला.

खोके, अवकाळी पाऊस, शेतकरी... दैनिक सामनातून फडणवीस यांच्या अर्थसंकल्पाची चिरफाड आणि हल्लाबोल
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून फडणवीस यांनी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. या पंचसूत्री कार्यक्रमानुसार त्यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला आणि सामाजिक न्यायाच्या गोष्टींवर अधिकर भर देत भरपूर घोषणाही केल्या. मात्र, विरोधकांनी या अर्थसंकल्पावर खडसून टीका केली आहे. घोषणांचे फुलोरे असं या अर्थसंकल्पाचं विरोधकांनी वर्णन केलं आहे. तर आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही अर्थसंकल्पाची चिरफाडच करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो पाहता राज्यातील जनतेला ‘दुबळी माझी झोळी’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची वास्तविक आर्थिक स्थिती जनतेच्या नजरेसमोर न येऊ देता महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्नाळू दुनियेची सैर घडवणारा हा अर्थसंकल्प आहे. सत्तेसाठी वाटेल तेव्हा, वाटेल तेवढ्या ‘खोक्यां’चा वापर करायचा आणि शेतकरी व जनतेसाठी मात्र निवडणुकीच्या वर्षात तेवढा घोषणांचा सुकाळ करून जनतेला सुखाची स्वप्ने दाखवायची, असेच हे धोरण आहे. कालच्या अर्थसंकल्पातून तरी असंच काही दिसतंय, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

गापिटीला लाजवेल अशा घोषणा

पुढील वर्षी म्हणजे 2024मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांची पिके झोपली, गारपिटीमुळे नुकसान झालं. या गारपिटीला लाजवेल अशा शब्दांचा आणि घोषणांचा पेटारा फडणवीस यांनी फोडला, अशी घणाघाती टीकाही करण्यात आली आहे.

मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

विविध जातींसाठी महामंडळे, रस्ते, रेल्वे आणि विमानतळासाठी निधीची घोषणा… अशा एक ना अनेक घोषणांचा भडिमार फडणवीस यांनी केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला. मायबाप सरकारने सुखांची बरसात करणारी स्वप्नांची सैर घडवावी, अशी जनतेची अपेक्षा नव्हतीच मुळी. तरीही अर्थसंकल्पातून घोषणांचा नुसताच ‘गाजर हलवा’ देऊन सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूलच केली. दुःख तेवढे दूर सारावे, एवढीच जनतेची माफक अपेक्षा आहे, असा चिमटा अग्रलेखातून काढण्यात आला आहे.

तातडीची निकड का टळली?

फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला. पण त्यापेक्षा शेतमालाची व पिकणाऱ्या प्रत्येक दाण्याची वेळेवर खरेदी आणि किफायतशीर भाव देण्याचा शब्द अर्थसंकल्पात दिला असता तर इतर पायलीच्या पन्नास घोषणांची गरजच पडली नसती. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने राज्यातील एक लाख एकरवरील पिके उद्ध्वस्त होऊनही त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे औदार्य अर्थमंत्री फडणवीसांनी का दाखवले नाही? अर्थसंकल्पातील सतराशे साठ घोषणांपेक्षा जी तातडीची निकड होती, तीच का टाळली?, असा संतप्त सवालही करण्यात आला आहे.