AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | संदीप देशपांडे यांच्या हल्लेखोरांना इशारा, भाजपला चिमटा तर सत्तेत येण्याचा दावा, राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 मुद्दे

राज ठाकरे यांनी आजच्या भाषणात अनेक मुद्द्यांवर हात घातला. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यावर राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

Raj Thackeray | संदीप देशपांडे यांच्या हल्लेखोरांना इशारा, भाजपला चिमटा तर सत्तेत येण्याचा दावा, राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 मुद्दे
| Updated on: Mar 09, 2023 | 10:10 PM
Share

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आज 17 वा वर्धापन दिवस आहे. मनसेच्या वर्धापन दिनाचा सोहळा आज पहिल्यांदाच ठाण्यात आयोजित करण्यात आला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसेच्या भव्य अशा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक मुद्द्यांवर हात घातला. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यावर राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसेच त्यांनी भाजपला देखील चांगलाच चिमटा काढला. त्यांच्या आजच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) राज ठाकरेंनी सर्वात आधी कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा

राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सर्वात आधी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. “मी काल महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिकडेही अशाच घोषणा झाल्या. घोषणा चालू असताना मला एक गोष्ट आठवली, विरोध होता तो, एकेदिवशी शिवचरित्रकार दत्तू मामा पोतदार रायगडावर गेले, जाता-जाता त्यांनी आकाशात पाहिलं, समोर शेतकऱ्याला विचारलं पाऊस पडेल का? त्याने बघितलं आणि म्हणाला वाटत नाही”, असं राज म्हणाले.

“थोड्या वेळाने ढग आले, जोरात पाऊस पडला. काय करायचं? यांनी टकटक केली. आतून आवाज आला. कोण आहे? यांनी सांगितलं शिवचरित्रकार दत्तू पोतदार. आतून आवाज आला इथल्या लोकांना जागा नाही. तसं माझ्या बाबतीत समजा झालं, मी झोपडीवर टकटक झाली आणि घोषणा देणाऱ्यांपैकी घरात घेतील का?”, असं राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि आभार. शुभेच्छा या असणारच आहेत. पण आभार या गोष्टीचं की, कोणतीही सत्ता नसताना तुमची ही ऊर्जा पक्ष पुढे घेऊन जात असते. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार”, असं राज ठाकरे म्हणाले.

2) संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना इशारा

“संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. आत्मचरित्राची चार पाने वाढली. त्यादिवशी मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल? एक निश्चित सांगतो, ज्याने केलंय त्याला पहिलं समजेल की हे त्याने केलंय. नंतर सगळ्यांना समजेल की हे त्याने केलंय. माझ्या मुलांचं असं रक्त मी वाया घालू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाहीत”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

3) ‘हा एक प्रपोगांडा’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“गेल्या सतरा वर्षाचं सिंहावलोकन होणंही गरजेचं आहे. पक्ष कशाकशातून गेला आणि कशाकशातून जातोय. काही लोकं पक्ष सोडून गेले, असं बोलतात. पण ते एकएकटे गेले. मग आपल्याला लोकं प्रश्न विचारतात की, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मग निवडणुकींना मतं का नाही पडत? 13 आमदार निवडून आले होते ते काय सोरेटवर निवडून आले होते का?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

“हे काय आहे, हा एक प्रपोगांडा आहे. सगळेच नव्हे, पण काही पत्रकार पक्षांना बांधलेले आहेत. पत्रकारांसाठी पाकीट असतं. मग हे जाणूनबुजून अशाप्रकारचा प्रचार करतात. 2014 काय 2019 काय, नरेंद्र मोदींची लाट. त्या लाटेमध्ये मला काय विचारताय सतरा वर्षात काय? काँग्रेसला विचारा. ज्या पक्षाने संपूर्ण देशात 50-60 वर्ष राज्य केलं त्या पक्षाची अवस्था बघा”, असं राज ठाकरे म्हणाले.

4) राज ठाकरे यांचा भाजपला इशारा

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी भाजपला देखील इशारा दिला. “भरतीनंतर ओहटी आणि ओहटीनंतर भरती या गोष्टी होतातच. भारतीय जनता पक्षानेही लक्षात घेतलं पाहिजे, आज भरती चालूय, ओहटी येणार. ओहटी येऊ शकते. नैसर्गिक आहे ती गोष्ट, ती कोणी थांबवू शकत नाही”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान, “या सगळ्या कालखंडात पुढे जात असताना आजच्या परिस्थितीत आमचा राजू पाटील बघा. पक्षाची बाजू विधानसभेत एकटे मांडत आहेत. शोले चित्रपटात बोलत नाही का, एकही है मगर काफी है. संपूर्ण विधानसभा भरली तर यांचं काय होईल? पण हे जाणूनबुजून अशाप्रकारचा प्रचार केला जातो”, असं राज ठाकरे म्हणाले.

5) राज ठाकरे यांचा पत्रकारांवर निशाणा

“ज्या लोकांकडून लिहिलं बोललं जातं ते समजून न घेता कुणीतरी सांगितलेलं असतं की या प्रकारे प्रचार करा. आणि मग ते पत्रकार तशाप्रकारे प्रचार करतात आणि संभ्रम निर्माण करतात. एवढी गर्दी जमते आणि मतं जातात कुठे? आंदोलनं अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. सगळ्या जबाबदाऱ्या आमच्याच आहेत का?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

“जे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात ते इथर पक्षांना विचारतात का? ज्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील 65 ते 70 टोलनाके बंद झाले. तेच अडीच वर्षापूर्वी गळ्यात गळे घालणारे शिवसेना आणि भाजप यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु. त्यांना एक पत्रकार प्रश्न विचारत नाही”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

6) ‘आपण सत्तेपासून दूर नाही’, कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्याचा प्रयत्न

“पक्ष चालवताना त्रास होतो. प्रत्येक पक्षाला त्रास होतो. आज भाजप सत्तेवर दिसतो, पण त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले. 1952 साली जनसंघ हा पक्ष स्थापन झाला, त्यावेळी कॉंग्रेस सोडून दुसरं काहीच नव्हतं. तीन वेळा अटलजी आले. परत काँग्रेस बोकांडी बसली. 2014 ला बहुमत हाती आलं. आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल”, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरण्याचा प्रयत्न केला.

“मी नुसती आशा दाखवत नाही. मला हे माहिती आहे. महापालिका जिंकायच्या आहेत. कधी निवडणूक होईल माहीत नाही. गेली २ वर्ष दहावीला नापास झाल्यासारखं वाटायला लागलंय. मार्च-ऑक्टोबर, मार्च-ऑक्टोबर… कधीही निवडणुका होऊदेत. महापालिकेत आपण सत्तेत असणार म्हणजे असणार”, असं राज ठाकरे म्हणाले.

7) ‘इतकं घाण, गलिच्छ राजकारण पाहिलं नाही’

“आता जे काही सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं आहे. इतकं घाण, गलिच्छ राजकारण मी आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं तो हाच आहे का? किती खालच्या पातळीला जाऊन बोलावं याची काही मर्यादाच उरलेली नाही. हल्ली बातमी नसतेच, फक्त हा काहीतरी बोलला, तो काहीतरी बोलला”, असं राज ठाकरे म्हणाले.

8) ’22 तारखेला कुणाला फाडायचं आहे, वाभाडे काढायचे आहेत, ते काढीन’

“22 तारखेला गुढीपाडव्याची सभा आहे. सायंकाळी ‘शिवतीर्था’वर यावं हे आपल्या सर्वांना आमंत्रण. मला जे काही बोलायचं आहे कुणाला फाडायचं आहे, वाभाडे काढायचे आहेत, ते मी 22 तारखेला काढीन”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. “यांच्या रोजच्या तमाशांना जनता विटलेली आहे. फक्त आपण त्यांच्यापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. महापुरुषांचे पुतळे उभारून काही होत नाही. जयंत्या, पुण्यतिथी या पलीकडे काही हाती लागणार नाही. ते काय करून गेले, बोलून गेले याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.

9) ‘…म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी’, राज ठाकरे यांचा भाजप खासदाराला टोला

“तुमचं हिंदुत्व म्हणजे नुसती जपमाळ असते का? प्रत्यक्ष कृतीतून तर कधी दिसत नाही. मला अयोध्येला बोलावलं, पण विरोध करणारे हिंदुत्त्ववादीच. आतलं राजकारण मला कळलं म्हणून मी गेलो नाही. मग ज्यांनी हे राजकारण केलं त्यांचं काय झालं पुढे? म्हणून आपल्या वाटेला जायचं नाही”, असा टोला राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांना लगावला. बृजभूषण सिंह यांच्यावर देशाच्या दिग्गज महिला मल्लांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरुनही पायउतार व्हावं लागलं आहे. त्याच गोष्टीचा धागा पकडत राज ठाकरेंनी नाव न घेता निशाणा साधला.

10) राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. “भोंगे प्रकरणात राज्यभर कार्यकर्त्यांवर केसेस केल्या आणि मुख्यमंत्रीपद गेलं. बोललो ना वाटेला जायचं नाही”, असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.