दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचे लक्षण, झेपेल तर करा, ‘सामना’तून मनसेवर टीका

| Updated on: Jan 25, 2020 | 9:10 AM

मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर शिवसेनेने 'सामना' मुखपत्रातून मनसेवर निशाणा साधला आहे (Shiv sena slams Raj Thackeray).

दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचे लक्षण, झेपेल तर करा, सामनातून मनसेवर टीका
Follow us on

मुंबई : मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून मनसेवर निशाणा साधला आहे. “एखाद्या राजकीय पक्षाने दोन झेंड्यांची योजना करणे ही गोंधळलेल्या मन:स्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे”, असा घणाघात शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून मनसेवर केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनाच्या दिवशी केलेले भाषण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे (Shiv sena slams Raj Thackeray). बाळासाहेबांच्या भाषणातील मंदिराच्या आरत्या, मुसमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे राज ठाकरे यांच्या भाषणात आल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आहे?

“मनसे प्रमुखांना त्यांचे मुद्दे माडंण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका आणि त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडेलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मुळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे आणि हे त्यांचे खेळ जुनेच आहेत”, असे अग्रलेखात म्हटले आहे.

“वीर सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्याचां खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्याचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्त्वाचाच आहे”, अशा शब्दात शिवसेनेने मनसेवर टीका केली.

“देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलुन द्या. नव्हे हाकलायलाच पाहीजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यासाठी एका राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे,” अशी टीकादेखील शिवसेनेने केली आहे.

मनसेकडून प्रत्युत्तर

दरम्यान, शिवसेनेच्या टीकेवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्यांनी ट्वीट करुन उत्तर दिलं आहे.