आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी
स्ट्राईक आशिया चॅम्पियनशिपच्या मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे स्पर्धेत आमनेसामने आले होते. या सामन्याचा निकाल लागण्यासाठी फार काही वेळ लागला नाही. भारतीय स्पर्धक संग्राम सिंहने अवघ्या 80 सेकंदात खेळ संपवला.

स्ट्राइक आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू आणि एमएमए फायटर संग्राम सिंहने इतिहास रचला आहे. त्याने मिक्स मार्शल आर्ट्स स्पर्धेत पाकिस्तानच्या मोहम्मद आबिद अली याला अवघ्या 80 सेकंदात पराभवाचं पाणी पाजलं. भारत पाकिस्तानचे स्पर्धेत आमनेसामने आले होते, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे या सामन्याची उत्सुकता वाढली होती. पण हा सामना क्षणिक ठरला. या सामन्यावर सुरूवातीपासूनच संग्रामने वर्चस्व गाजवलं आणि पाकिस्तानच्या मोहम्मद अलीला 1 मिनिटं आणि 20 सेकंदात चितपट केलं. विलक्षण शक्ती, अचूकता आणि संयम दाखवत संग्रामने लढत संपवली. या विजयासह संग्राम सिंहचा व्यावसायिक एमएमएमधील अजिंक्य विक्रम अबाधित राहिला आहे.
काय म्हणाला कुस्तीपटू संग्राम सिंह?
संग्राम सिंहने या स्पर्धेत आपलं वर्चस्व असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. यापूर्वी एमएमए लढतीत त्याने पाकिस्तानच्या अली रझा नासिर, ट्युनिशियाच्या हकीम त्राबेल्सी आणि फ्रान्सच्या फ्लोरियन कुडियर याला पराभूत केलं आहे. आता यात मोहम्मद आबिद अलीला पराभूत केल्यानं आंतरराष्ट्रीय विक्रमात भर घातली आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद आबिद अली याला पराभवाची धूळ चारल्यानंतर संग्राम सिंहने आपल्या भावना व्यक्त केल्या. संग्राम सिंहने विजेतेपद भारताच्या जनतेला समर्पित केले आणि म्हणाला की, प्रत्येक वेळी स्पर्धेत भाग घेताना तो राष्ट्राची स्वप्ने आणि अभिमान सोबत घेऊन जातो.
मिक्स मार्शल आर्ट्स स्पर्धा कशी असते?
हा एक लढाऊ कुस्तीचा खेळ आहे. यात कुस्ती, बॉक्सिंग, जुजुस्तु, कराटे आणि किकबॉक्सिंग अशा विविध स्पर्धांचा मेळ असतो. ही स्पर्धा अष्टकोनी जाळीच्या आत खेळली जाते. ही स्पर्धा तीन प्रकारे जिंकता येते. नॉकआऊट म्हणजे प्रतिस्पर्ध्याला जोरदार पंच किंवा किक करून बेशुद्ध किंवा असह्य केल्यास विजय मिळतो. सबमिशन हा विजयाचा दुसरा प्रकार आहे. यात लॉक तंत्राचा वापर करून प्रतिस्पर्ध्याला हार मानण्यास प्रवृत्त केलं जातं. तिसरं निर्णय हा सामना पूर्ण वेळेत संपल्यास पंच गुणांच्या आधारे विजेता घोषित करतात.
