
मुंबई – ”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात अनेक ठीकाणी आंदोलने होत आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. कंगनाने केवळ देशाचाच नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे कंगनाने देशाची माफी मागावी अशी मागणी यावेळी संतप्त शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने बोरिवली रेल्वे स्टेशनबाहेर कंगनाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच तिला देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील या वादग्रस्त वक्तव्यावरून कंगनावर जोरादार हल्लाबोल केला होता. कंगनाने देशाचा अपमान केला आहे, तिने देशाची माफी मागणी असे ते म्हणाले होते. तसेच तिचे सर्व पुरस्कार काढून घ्यावेत अशी मागणी देखील त्यांनी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असेही ते म्हणाले होते.
संबंधित बातम्या
VIDEO: तोंडाला रुमाल, हातात काठ्या, शेकडो तरुण रस्त्यावर; अमरावतीत जमावाकडून प्रचंड दगडफेक